चार महिन्यात चाईल्ड लाईनवर १ लाख ९० हजार ४९ तक्रारिंची नोंद ; महाराष्ट्रातील धक्कादायक चित्र ; अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ७११ कॉल्स
इचलकरंजी / अतुल भोसले
कोरोना महामारीच्या काळात देशासह महाराष्ट्रात मार्च ते जून या काळात कडक लॉकडाऊन असतानाही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून चाईल्ड लाईनवर तब्बल १ लाख ९० हजार ४९ विविध तक्रारिंची नोंद झाली आहे. राज्यात या काळात बहुतांशी उद्योगधंदे बंद असताना व संपूर्ण कुटुंब घरामध्ये बंदिस्त असताना नोंद झालेल्या या तक्रारी राज्याची सामाजिक स्थिती बिघडत असल्याचे बोलके चित्र आहे.
देशामध्ये लॉकडाऊन सारखे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना बंदची हाक दिली. त्यानंतर २४ मार्चला देशाबरोबरच राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे वेळोवेळी राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. या काळात राज्यातील सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, वाहतूक, धार्मिक स्थळे हे पूर्णपणे बंद करण्यात आलीच शिवाय संचारबंदीही करण्यात आली. त्यामुळे काही अपवाद वगळता राज्यातीलबहुतांशी कुटुंब ही घरातच बंदिस्त होती. हा लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचा काळ मार्च ते जून महिन्यापर्यंत होता.
याच काळात महाराष्ट्रातून मुलांवर होणार्या अन्यायासंदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री असणार्या चाईल्ड लाईनसारख्या हेल्पलाईनवर तब्बल १ लाख ९० हजार ४९ तक्रारी नोंद झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९२८ प्रकरणात बाल विवाह, विविध प्रकारचे शोषण, बाल कामगार, मुले हरवली-सापडली, यासह विविध प्रकारच्या शोषणांविरोधात थेट हस्तक्षेप करूनसंरक्षण देण्याची मागणी केल्याची नोंद आहे.
काय आहे चाईल्ड लाईन १०९८
देशामध्ये लहान मुलं व युवांवर होणाऱ्या अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कट्टा, लेप्र, हेल्प एज इंडिया, माहेर, मीर फौंडेशन, पाथ वे इंडिया, स्माईल फौंडेशन, चाईल्ड लाईन अशा सुमारे ३१ हून अधिक अशासकीय संस्था कार्यरत आहेत. मुंबई येथील टाटा इन्स्टिीट्यूटच्या समाजशास्त्र विभागातील जेरू बिलीमोरिया यांना १९९६ मध्ये प्रयोगिक तत्वावर चाईल्ड लाईनची सुरूवात मुंबईमध्ये केली. त्यानंतर भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने १९९८-९९ मध्ये संपूर्ण देशात याची टोल फ्री सेवा उपलब्ध करून दिली. देशातील पहिली टोल फ्री सेवा देणार्या चाईल्ड लाईनने देशातील विविध राज्यातील ५४३ हून अधिक जिल्ह्यात तर ११७ हून अधिक रेल्वे स्थानकावर आपले सेंटर सुरू केले आहेत.
अन्यायग्रस्त मुलां – मुलीसाठी उपयुक्त
लैंगिक शोषणास बळी पडलेली मुलं-मुली, बालकामगार, बाल विवाह, घरगुती मोलकरीन म्हणून काम करणार्या मुली, कुटुंब तसेच शैक्षणिक संस्थांच्या शारीरिक, लैंगिक तसेच भावनिक गैरवर्तनाच्या दडपणाखाली वावरणारी मुलं-मुली, देह व्यापार करण्यास भाग पडलेल्या मुली, घरातून पळून गेलेली मुलं, पळवून नेलेली मुलं, एचआयव्ही बाधित मुलं यांसह विविध घटकात अन्याय होणार्या मुलां-मुलींसाठी, युवकांसाठी १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास त्याची तात्काळ संस्थेच्या माध्यमातून दखल घेवून कार्यवाही केली जाते. दरवर्षी सरासरी ३० हजार पीडीत मुलांची सुटका या चाईल्ड लाईन संस्थेच्या माध्यमातून केली जात असल्याचा दावा केला जात आहे.
राज्यातील जिल्हानिहाय तक्रारिंची आकडेवारी
१. अहमदनगर – २०,७११
२. अकोला – ६,८१४
३. अमरावती – २,३९३ ४. औरंगाबाद – २,५३९
५. बीड – ७,२०५ ६. भंडारा – २,०९९
७. बुलढाणा – १,६८९ ८. चंद्रपुर – १,७०५
९. धुळे – १,१८६ १०. गडचिरोली – १,०२८
११. गोंदिया – १,०२६ १२. हिंगोली – ७०८
१३. जळगाव – ९३२ १४. जालना – ६४४
१५. कोल्हापूर – ८११ १६. लातूर – १,१९२
१७. नागपूर – ७४१ १८. नांदेड – ३६८
१९. नंदूरबार – १९९ २०. नाशिक – ५६९
२१. उस्मानाबाद – ८७ २२. परभणी – १४१
२३. पुणे – ३१४ २४. रायगड – १०५
२५. रत्नागिरी – १७२ २६. सांगली – १७६
२७. सातारा – २२६ २८. सिंधुदूर्ग – १३४
२९. सोलापूर – ३३१ ३०. ठाणे -१११०
३१. वर्धा – २४७ ३२. वाशिम – १७०
३३. यवतमाळ – १६६ ३४. पालघर -०
३५ व ३६ मुंबई (मुख्य/उप)- ४१३५
महाराष्ट्र मोबाईल – १,२७,९७६
एकूण – १,९०,०४९