प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यानंतर ऑक्टोबर पर्यंत 6 ते 7 महिन्यांच्या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. त्यामुळेच लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख व राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचेकडे केली. याबाबत मार्ग काढू अशी ग्वाही पवार यांनी शिष्टमंडळास दिली.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर स्वस्त व कांही प्रमाणात मोफत दिलेले धान्य वगळता केंद्र, राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. देशातील केरळ, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यातील शासनांनी घरगुती वीज बिलांमध्ये 50 टक्के सवलत दिली व जनतेला दिलासा दिला. पण पुरोगामी व प्रगत महाराष्ट्र सरकारने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. या कडे पवार यांचे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
दरमहा 300 युनिटस पर्यंत वीज वापर असणाऱया राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील 6 महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण वा संबंधित कंपनीस अनुदान स्वरूपात द्यावी. तसेच कृषीपंपाची ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2020 या 5 वर्षांतील थकबाकी वरील व्याज आकारणी रद्द करण्यात यावी. या योजनेमध्ये ग्राहकांना पहिल्या वर्षी जेवढी रक्कम भरतील तेवढी म्हणजे भरलेल्या रकमेच्या 100 टक्के सवलत मिळणार आहे. तथापि दुसऱया व तिसऱया वर्षी ही सवलत भरलेल्या रकमेच्या फक्त 30 टक्के व 20 टक्के अशी आहे. या सवलतीमध्ये वाढ करुन ती भरलेल्या रकमेच्या 75 टक्के व 50 टक्के याप्रमाणे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे बाबासो पाटील भुयेकर, विक्रम पाटील किणीकर, रावसाहेब तांबे, शैलेश चौगुले यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.