कालावल खाडीत निर्माण होतोय रोजगार
परेश सावंत / आचरा:
बेसुमार यांत्रिकी मासेमारी व नौकांची वाढती संख्या यामुळे सरासरी मत्स्योत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे. काही माशांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत. अशातच ‘कोरोना’चा फटका शहरी भागाबरोबर ग्रामीण भागालाही बसला आहे. परंतु या कालावधीत मधली तोंडवळी येथील ग्रामस्थांनी वाघेश्वर बचतगटाच्या माध्यमातून केज कल्चर (पिंजऱयातील मासेमारी) प्रकल्प यशस्वी करून दाखविला. तोंडवळी ग्रामपंचायत, वनविभाग, कांदळवन कक्ष यांच्या सहकार्याने कालावल खाडी पात्रात पिंजऱयातील मत्स्यशेती प्रकल्प राबविला आहे. कोरोनामुळे उद्धवलेल्या
आर्थिक संकटात मच्छीमारांना हा कल्चरचा प्रयोग उपयुक्त ठरला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 350 किलो माशांची विक्री या प्रकल्पातून करता आली आहे.
कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड आवश्यक असते. अशीच मेहनत मधली-तोंडवळी येथील तरुणांनी घेत केज कल्चर (पिंजऱयातील मासेमारी) प्रकल्प राबविण्याचे ठरविले. त्यांना प्रोत्साहन लाभले ते तोंडवळी सरपंच आबा कांदळकर यांचे. मत्स्यबीज उपलब्ध करून देणे, तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, मत्स्यबीज सोडण्यापासून ते तयार मासे काढण्यात सक्रिय सहभाग घेणे, स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करत प्रकल्प राबविणारे तरुण व शासन यांच्यातील संपर्काचे माध्यम बनून तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम सरपंच कांदळकर यांनी केले.
बचतगटाची मेहनत फळाला
डिसेंबर महिन्यात कालावल खाडीपात्रात जिताडा या मासळीची सुमारे 4 हजार मत्स्यबिजे चार पिंजऱयात सोडली. कांदळवने कक्षाच्या मार्गदर्शनाखाली पिंजऱयातील मत्स्यबिजांची देखभाल करण्यात आली. त्यानंतर जूनमध्ये पूर्ण वाढ झालेले जिताडा मासे पिंजऱयाबाहेर काढण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे 350 किलो वजनाची मासळी मिळाली असून 355 किलो दर मिळाला आहे. केज कल्चर माध्यमातून मधली तोंडवळी येथील बचतगटांमध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. यासाठी वाघेश्वर बचतगटचे सदस्य सदानंद पाटील, मंगेश नाईक, समीर भोवर, विवेकानंद नाईक, बाबल नाईक, शांताराम पाटील, अनिल पाटील, राहुल पाटील, आप्पा हडकर, अमित पाटील, सुभाष पाटील यांनी मेहनत घेतली.
मत्स्यबीज गावातच तयार करणार
या प्रकल्पाला लागणारे मत्स्यबीज हे सुमारे अठराशे किलोमीटर एवढा लांब पल्ला गाठत आंध्रप्रदेशवरून आणावे लागते. यात प्रवासादरम्यान यातील काही बीज नष्ट पावते. त्याचा फटकाही बसतो. म्हणून पुढील काळात गावातच मत्स्यबीज वाढविण्यासाठीचा प्रयत्न करणार असून त्यामुळे लागणारा वाढीव कालावधी कमी होऊन उत्पादन क्षमता वाढवता येईल, असे सरपंच कांदळकर यांनी सांगितले.