राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिळा रेड्डी यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊन कालावधीत महिलांवरील छळ प्रकरणी कर्नाटक राज्य महिला आयोगाकडून झालेल्या प्रसारवाहिन्यांवरील थेट प्रक्षेपणावेळी, कौन्सिलिंग आणि ई-मेलद्वारे 425 तक्रारी दाखल झाल्या होत्या, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा प्रमिळा रेड्डी यांनी दिली आहे.
लॉकडाऊन कालावधीत अनेक महिलांना रोजगार गमवावा लागला होता. अनेकांनी वर्क फ्रॉम होम पद्धतीने कार्यालये, कंपनीची कामे केली. अशा कालावधीत अनेक कौटुंबिक कलह उद्भवले. त्यातील अनेक प्रकरणांवर तोडगा काढण्यात राज्य महिला आयोग यशस्वी ठरले आहे, असे त्या म्हणाल्या.
गंभीर प्रकरणांसंबंधी महिला आयोग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून कारवाई करण्याची सूचना देत आहे. काही प्रकरणांवर समुपदेशनाद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुरुषांकडून महिलांची फसवणूक, छळ झालेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जात आहे. लॉकडाऊन काळात आजारी असणाऱया महिलांना औषधे, गरीब महिलांना विविध संस्थांमार्फत आहार किट वितरीत करण्यात आले. एप्रिल 2020 मध्ये आशा कार्यकर्त्यांवरील हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सूचना महिला आयोगाच्या आयुक्तांना देण्यात आली आहे, अशी माहितीही प्रमिळा यांनी दिली.
लॉकडाऊननंतर आपण राज्यातील 19 जिल्हय़ांचा दौरा करून तेथील स्वआधार, महिला निलय, एमएसपीटीसीएल, उज्ज्वल, सखी- वन स्टाफ सेंटरना भेटी देऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला आहे. महिला छळ प्रकरणासंबंधी तक्रारी दाखल करण्यासाठी 080-22216486 या क्रमांकाशी संपर्क किंवा kswbang123@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या.