कारखानदार पुन्हा एकदा चिंतेत : बाहेरून येणाऱया ऑर्डर थांबल्याने उद्योग बंद करण्याची वेळ : कच्चा माल नसल्याने मोठे संकट
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. हे लॉकडाऊन जरी महाराष्ट्रात असले तरी त्याचा फटका मात्र बेळगावच्या कारखानदारांना बसू लागला आहे. बेळगावमध्ये तयार होणाऱया कच्च्या मालावर पुणे व मुंबई येथे प्रक्रिया केली जाते. त्या ठिकाणचे परप्रांतीय कामगार पुन्हा गावी गेल्यामुळे उद्योग ठप्प आहे. या सर्वाचा फटका बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे.
देशातील एक उत्तम प्रकारचा फौंड्री क्लस्टर बेळगावमध्ये आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून फौंड्री उद्योगातून ऑटोमोबाईल तसेच इतर क्षेत्रासाठीचे साहित्य तयार केले जाते. बेळगावमध्ये फौंड्री तसेच त्यावर आधारलेले अनेक उद्योग आहेत. या सर्व उद्योगांना महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. बेळगावचे औद्योगिक क्षेत्र हे अनेक बाबींसाठी महाराष्ट्रावर अवलंबून आहे. कच्चा माल, प्रक्रिया झालेला माल, औद्योगिक उपक्रम हे सर्व महाराष्ट्रामधून येत असल्याने औद्योगिक क्षेत्रावर याचा परिणाम दिसू लागला आहे.
मागील वषीही कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला तोटा सहन करावा लागला होता. बाहेरून येणाऱया ऑर्डर थांबल्याने उद्योग बंद करण्याची वेळ कारखानदारांवर आली. कारखान्यांमधील काम कमी झाल्यामुळे अनेक लघु उद्योजकांनी इतर व्यवसायही सुरू केले. हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उद्योग संथगतीने सुरू होते. दिवाळीनंतर काही प्रमाणात उद्योगांना देशाबाहेरील ऑर्डर मिळू लागल्याने उद्योगांची स्थिती पूर्वपदावर येत होती.
एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जरी कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी कच्चा माल नसल्याने तेथील उद्योगांसमोर मोठे संकट आहे. या सर्वाचा फटका बेळगावच्या उद्योग क्षेत्राला बसत आहे. बेळगावमध्ये तयार झालेल्या मालावर महाराष्ट्रात प्रक्रिया होत असल्याने उद्योगांची गती हळुहळू मंदावू लागली आहे. यामुळे कारखानदार पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत.