सावंतवाडीतील बिहारी कामगारांना लॉकडाऊन कधी संपतंय, याचीच प्रतीक्षा
विजय देसाई / सावंतवाडी:
‘कौनसी बिमारी है, हमे मालूम नही है। लॉकडाऊन है इतना हमे मालूम है। साहब आये थे। उन्होंने 14 तारीख तक इधरसे हिलना मत, ऐसा कहा है। हमे लॉकडाऊन खत्म होने का इंतजार है। बादमें क्या करना है ये सोचेंगे।’ असे मळगाव येथील सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरातील कॅम्पमध्ये ठेवलेल्या बिहारी कामगारांनी सांगितले. कोरोनाने जगात थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती ठाण मांडून आहे. कोरोनाबाबत कुणाला माहिती नसेल अशी व्यक्ती क्वचितच असेल. परंतु कोरोनाबाबत काहीही माहिती नसलेली माणसे असू शकतात, हे रेल्वे स्टेशनजवळच्या कॅम्पात असलेल्या मजुरांच्या बोलण्यातून लक्षात येते.
लॉकडाऊन असल्याने रेल्वे तसेच अन्य सेवा बंद आहेत. त्यामुळे कुठल्यातरी आजारामुळे बंद असल्याचे या कामगारांना माहिती आहे. मात्र या आजाराचे नाव काय, त्याची लक्षणे काय, हा आजार होऊ नये याबाबत काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे त्यांना या आजाराबाबतची माहिती देण्याबरोबर काय खबरदारी घ्यावी, याची माहिती द्यावी लागली.
बिहारच्या औरंगाबाद जिल्हय़ातील हे नऊ कामगार आहेत. ते 15 फेब्रुवारीला सिंधुदुर्गात कामाच्या शोधात आले होते. आंध्रप्रदेशातील रेल्वेची काम घेणाऱया ठेकेदाराने त्यांना रेल्वेच्या छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी दररोजच्या 350 रुपयांच्या मजुरीवर कामाला ठेवले. रेल्वे लाईनवरील वेगवेगळी कामे ते करतात. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानंतर ठेकेदाराने त्यांना वाऱयावर सोडून पलायन केले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी येथेच कॅम्पमध्ये राहायला सांगितले. या कामगारांची धान्याची सोय करण्यात आली. काहीजण तेथील झोपडीत, तर काहीजण तेथील रेल्वेच्या शेडमध्ये राहतात.
कामगारांना लॉकडाऊन माहीत आहे. कुठल्या तरी रोगामुळे लॉकडाऊन करण्यात आले, एवढेच त्यांना कळते. मात्र आजाराचे नाव, त्याची लक्षणे या संदर्भात त्यांना कल्पना नाही. केवळ पोटाचा प्रश्न सोडविणे यासाठीच त्यांची धडपड दिसते. या मजुरांचे शिक्षण फारसे झाले नाही. कुणी पहिली, कुणी दुसरी, तर कुणी तिसरी असे शिकले आहेत. घरची परिस्थिती गरिबीची. त्यामुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांच्यापैकी कुणाचीही गावी शेती नसल्याने तेथेही मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे कामाच्या शोधात महाराष्ट्रात आले. परंतु त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर कोरोनाने केला आहे. आता या सर्वांचे लॉकडाऊन कधी संपते, याकडे लक्ष आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचे, याचा विचारही त्यांना सतावत आहे. गावाकडे अशीच परिस्थिती असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून मोबाईलद्वारे कळते. साधे मोबाईल असल्याने जगात घडणाऱया बातम्यांपासूनही ते अलिप्त आहेत. परिस्थितीमुळे आम्हाला शिकता आले नाही. परंतु आता मुले शिकत आहेत. ‘बिहारमें नितीशकुमार अच्छा काम कर रहे हैं, वो बच्चोंको पढनेको कहते है।’ असे अजयकुमार गुप्ता याने सांगितले.
‘इधर साहब आऐ थे, उन्होंने राशन दिया है, इधर-उधर घुमने को मना किया है।’ असे गुप्ता याने सांगितले.