राज्यांच्या मागणीचा केंद्राकडून विचार, कोरोनाबाधितांची संख्या वाढली
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात येऊनही साथ म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही, हे लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ही माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिल पर्यंत होता. त्यामुळे त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने हटवावा अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मात्र अनेक राज्यांमध्ये ही साथ दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरी लॉकडाऊन हटविल्यास लोक रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी प्रचंड गदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या साथीचा प्रसार झपाटय़ाने होऊ शकतो. शिवाय एकदा लॉकडाऊन उठविल्यानंतर तो पुन्हा लागू करणेही अवघड आहे. म्हणून तो सुरू आहे तोपर्यंतच त्याचा कालावधी वाढविणे सोपे जाईल, असे मत व्यक्त होत असून त्यावर गांभीर्याने चर्चा होत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन थेट 3 जून पर्यंत वाढविण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कालावधी वाढविण्याची आग्रही मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन दिले आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कालावधी वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लॉकडाऊन एकदम काढणे शक्य नसून तो टप्प्याटप्प्यानेच काढण्यात यावा अशी सूचना केली.
एक आठवडा निर्णायक
लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिल पर्यंत आहे. तो संपायला अजून 1 आठवडा बाकी आहे. त्यामुळे हे सात दिवस अत्यंत निर्णायक आहेत. यात साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसली तर लॉकडाऊन लवकर उठविला जाऊ शकतो. मात्र, तसे न झाल्यास तो आणखी काही आठवडय़ांसाठी वाढविला जाऊ शकतो. म्हणून सर्व लोकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर आणखी अधिक काळ घरात बसण्याची वेळ येणार आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
ग्रस्तांची संख्या वाढली
देशात मंगळवारी कोरोना ग्रस्तांची संख्या 354 ने वाढली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, ही वाढ त्यापूर्वीच्या दिवसापेक्षा निम्म्याने कमी आहे. असाच कल राहिल्यास नव्या रूग्णांच्या संख्येचा आलेख स्थिरावेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. तथापि हा घसरता कल आणखी एक आठवडा कायम राहिला पाहिजे, असेही तज्ञांचे मत आहे.
एकाकडून 430 जण होतात बाधित
एक कोरोना ग्रस्त व्यक्ती सात दिवसांमध्ये 430 जणांना बाधित करू शकते, असे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांची चाचणी करणे आणि बाधितांना वेगळे करणे हा महत्वाचा उपाय आहे. हे 430 जण नंतर सहस्रावधी इतरांना बाधित करू शकतात. ही साखळी प्रक्रिया हाताबाहेर गेली तर महाविनाश उद्भवू शकतो. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त दिवस घरात रहावे, अशी सूचना अनेक डॉक्टरांनीही दिली आहे.
देशात 4,421 रूग्ण
सोमवार संध्याकाळी 6 ते मंगळवार संध्याकाळी 6 या 24 तासांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 354 ने वाढल्याने एकंदर देशातील संख्या 4 हजार 421 झाली आहे. याच कालावधीत मृत्यूंची संख्याही 8 ने वाढली आहे. आजही रूग्णसंख्या आणि मृत्यू यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या राज्यातील रूग्णांची संख्या 1000 ला भिडली आहे. यापैकी 600 हून अधिक रूग्ण एकटय़ा मुंबईतील आहेत. पुण्यातही संख्या 200 च्या पुढे पोहचली आहे.
तामिळनाडूत तबलीग कहर
तामिळनाडू राज्यात आतापर्यंत 690 रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी तबलीगच्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्यांची संख्या तब्बल 636 आहे. तबलीग रूग्णांची संख्या तुलनात्मकदृष्टय़ा याच राज्यात सर्वाधित आहे. आतापर्यंत देशात एकंदर 1,640 तबलीगी रूग्ण सापडले आहेत. त्यांची संख्या एकंदर रूग्णसंख्येच्या 35 टक्के आहे, असे केंद्र सरकारने घोषित केले आहे.
जोरदार प्रयत्न, आशेचा किरण
ड सोमवारपेक्ष मंगळवारी रूग्ण्संख्या घटली, हा कल टिकणे महत्वाचे
ड भारतात लस, औषध शोधण्याचे प्रयत्न जोरदार, यशाचा विश्वास
ड रूग्णसंख्या आणि मृतांची संख्या यात आजही महाराष्टाची आघाडी
ड देशाच्या 300 हून अधिक जिल्हय़ांमध्ये आता कोरोनाबाधित रूग्ण