पुढील आठ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोविडमुळे जनताही आता हतबल झाली असून खुद्द मुख्यमंत्र्यांवर देखील आता मंत्री आणि आमदारांचा लॉकडाऊन वाढविण्यासाठी जोरदार दबाव येत आहे. मंत्री मायकल लोबो यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन वाढवावा, अशी जोरदार मागणी केलेली आहे. अनेक नेत्यांनी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे देखील लॉकडाऊनची जोरदार मागणी केली असून मुख्यमंत्री आपली भूमिका आज सायंकाळी स्पष्ट करतील व पुढील आठ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.
राज्यात शनिवारी 40 जणांचा मृत्यू आणि राज्यातील सर्व इस्पितळे रुग्णांनी भरुन वाहत आहेत. अद्याप हजारभर रुग्ण गंभीर स्वरुपात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता तरी लॉकडाऊन वाढवून द्याच असा जोरदार आग्रह भाजपच्या अनेक आमदारांनी व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोनवर चर्चा करुन केली. त्याचबरोबर अनेकांनी प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडेही मागणी केली.
लॉकडाऊनला केंद्रीय भाजपचा विरोध?
गोव्याकडे नेहमीच वक्रदृष्टीने पाहणाऱया केंद्रातील भाजप सरकारने गोवा सरकारवर लॉकडाऊन लागू करण्यात येऊ नये यासाठी गेले कित्येक दिवस प्रचंड दबाव आणलेला आहे. त्यामुळे येथील नेत्यांना लॉकडाऊन हवा असून देखील ते लाऊ शकत नाहीत. परंतु परवा एकाच दिवशी 38 जणांनी प्राण गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साडेतीन दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. आता शनिवारी एका दिवसात 40 व कालच्या एका दिवसातील उर्वरित 14 मिळून 54 जणांचे प्राण गेले. यामुळे आता गोवा सरकारदेखील गंभीर बनले आहे आणि आता आमदार आणि मंत्र्यांनी जोरदार दबाव आणल्याने लॉकडाऊनचा कालावधी किमान आठ दिवसांसाठी वाढविण्याचे घातक आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज सायंकाळी करतील.
दरम्यान, सोशल मीडियावर सरकारवर जोरदार टीका चालू असून गेली कित्येक दिवस गरज असून देखील सरकारने लॉकडाऊन लागू केला नसल्यामुळेच आता मरणाऱयांची संख्या वाढतेय आणि या संपूर्ण आरोग्य क्षेत्राची परिस्थिती कोलमडलेली आहे. सरकारदेखील आता पूर्णतः हतबल झालेली आहे. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊन पुन्हा वाढवावा अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे.
कळंगूटमध्ये 100 टक्के लॉकडाऊन
दरम्यान, मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन राज्यात आणखी दहा दिवसांचा लॉकडाऊन वाढवावा यासाठी साकडे घातले. तसेच त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांना देखील तशी विनंती केली. कळंगूटमध्ये त्यांनी 100 टक्के लॉकडाऊन सुरु केलेला असून तेथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.