दुकान उघडण्याचे आवाहन करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, दुकानांवर कारवाई
वार्ताहर/ कराड
लॉकडाऊनला विरोध करीत बुधवारी दुकाने उघडण्याचा निर्णय व्यापाऱयांनी घेतला होता. मात्र जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे पालन करीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने उघडल्यास पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्याने व्यापाऱयांचा लॉकडाऊनचा विरोध मोडीत निघाला. यावेळी दुकाने उघडण्याचे आवाहन करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दत्त चौकात पालिका अधिकारी, कर्मचारी व पोलीस तैनात केल्याने छावणीचे स्वरूप आले होते. तणावही निर्माण झाला होता. दरम्यान मंडई परिसरातील उघडलेल्या दुकानांवर पालिका व पोलिसांनी कारवाई केली. यावेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
तीन जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने कराड शहरासह मलकापूर परिसरातील व्यापारी व विविध संघटनांच्या माध्यमातून लॉकडाऊनला विरोध वाढला आहे. लॉकडाऊन मागे घ्यावा, यासाठी व्यापारी व संघटनांनी प्रशासनाला निवेदने दिली आहेत. व्यापाऱयांच्या झालेल्या बैठकीत बुधवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच पालिका व पोलीस प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळपासूनच शहरात ध्वनिक्षेपकावरून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दरम्यान सोशल मिडीयातून व्यापाऱयांना आज सकाळी दत्त चौकात येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील काही व्यापारी जमाही झाले. यावेळी बंदोबस्तावर असणाऱया पोलिसांसोबत शाब्दीक चकमक झाल्यानंतर दुकाने उघडण्याचे आवाहन करणाऱया दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मलकापूर येथून आलेल्या काही महिला व्यापाऱयांनाही पोलीस अधिकाऱयांनी खडे बोल सुनावत परत जाण्यास भाग पाडले. यामुळे दत्त चौकात चांगलीच गर्दी झाली होती. व्यापाऱयांनी दुकाने उघडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी प्रशासनाने स्पीकरवरुन दिला.
कराडचे डीवायएसपी रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पोलीस, महसूल व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारीही यावेळी मोठय़ा संख्येने दत्त चौकात ठाण मांडून होते. याशिवाय शहरात फिरून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे व्यापाऱयांनी पालन करावे, यासाठीचे आवाहन करण्यात येत होते.
मंडईतील 13 दुकानांवर कारवाई
मुख्य भाजी मंडई परिसरात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त काही दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी गर्दी पांगवत एकुण तेरा दुकाने सील करण्यात आली. या कारवाईनंतर अत्यावश्यक नसणारी दुकाने बंद झाली.