केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती, आता 12.9 दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिलतेनंतरही रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे. आता 12.9 दिवसांनी देशातील रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. एकुण रूग्णांपैकी 34.06 टक्के रूग्ण बरे होत आहेत. जगात कोरानामुळे 6.92 टक्के मृत्यू होत आहेत. भारतात हा टक्का 3.23 इतका आहे, अशी माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. दरम्यान, 51 हजार 401 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 27 हजार 920 रूग्ण पूर्ण बरे झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील 79 टक्के कोरोनाबाधित हे 30 शहरांमधील आहेत. सद्यस्थितीत 18 हजार 855 व्हेटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने 84.22 लाख एन 95 मास्क आणि 47.98 लाख व्यक्तिगत संरक्षण साधन (पीपीई) किट राज्यांना वाटप केले आहे. देशात 3 लाख पीपीई कीट आणि एन-95 मास्कची निर्मिती होत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. देशातील एकुण रूग्णसंख्या 82 हजार 834 इतकी झाली आहे. आतापर्यंत 2 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘बीएसएफ’चे 11 जवान बाधित
मागील 24 तासांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 11 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. 10 त्रिपुरा येथील असून तीन दिल्लीतील आहेत. दिल्लीतील भारतीय सैन्यदलाच्या मुख्यालयात शुक्रवारी एक रूग्ण आढळला. यानंतर संबंधित इमारतीमधील मजला सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘नीट’च्या विद्यार्थ्यांना दिलासा
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेसाठी (नीट) विद्यार्थ्यांना शुक्रवारी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला. त्यांनी परीक्षेसाठी केलेल्या अर्जांमधील चुकीच्या दुरूस्ती करणे आणि परीक्षा केंद्रासाठी शहराची निवड करण्यासाठी आता 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना आपल्या घरापासून जवळचे परीक्षा केंद निवडण्याची संधी उपलब्ध व्हावी. विविध राज्यांमध्ये प्रवासावरही मर्यादा असल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.