मुरगावात 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन जनता कर्फ्यू 10 ऑगस्टपर्यंत कायम आजपासून सर्व व्यवहार सुरु
प्रतिनिधी / पणजी
राज्यात लागू केलेले तीन दिवशीय लॉकडाऊन आज सोमवारी सकाळी 6 वाजता संपुष्ठात आले आहे, मात्र मुरगाव तालुक्यासाठी 24 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे. राज्यात जनता कर्फ्यू मात्र 10 ऑगस्टपर्यंत रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचा निर्णय रविवारी सांयकाळी उशिरा जाहीर करण्यात आला. त्यामुळे आज सोमवारपासून मुरगाव तालुका वगळता राज्यभर सर्व व्यवहार सुरू होतील.
शुक्रवार ते रविवारपर्यंत तीन दिवस राज्यात लागू केलेले लॉकडाऊन संपुष्टात आले. यावेळी जनतेने स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळले. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिले. रस्ते, महामार्ग सुनसान राहिले, तर लोकांनी घराबाहेर न पडता घरी बसून राहणे पसंत केले. लॉकडाऊनचे काटेकोरपणे लोकांनी पालन केले.
आजपासून सर्व व्यवहार सुरु
आज सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरु होणार आहेत. शासकीय कार्यालयांबरोबरच खासगी आस्थापने, मार्केट, वाहतूक सेवा, अन्य दैनंदिन व्यवहार सुरु होणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरुच राहणार आहे.
लोकांनाही हवे होते लॉकडाऊन
तीन दिवशीय लॉकडाऊन रविवारी संपुष्टात आल्यानंतर सोमवारपासून लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाईल, अशी अपेक्षा लोकांना होती. कारण गोव्यात विविध भागात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचे लोण पसरले आहे. दक्षिण गोव्यातील स्थिती तर आटोक्यापलिकडे गेली आहे. त्यामुळे सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेईल अशी अपेक्षा लोकांना होती, पण लॉकडाऊन वाढविण्यात आले नाही. रविवारी सायंकाळी काही वाहने रस्त्यावर फिरताना दिसली. रविवारी अमवास्या अनेकांनी रात्री साजरी केली. अमावश्या रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू होते. त्यानंतर सोमवार व मंगळवारपासून श्रावणमासाला प्रारंभ होतो.
येत्या 10 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. नपेक्षा रस्त्यावर येणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन झाले
कोरोनावाढीची धास्ती वाढत असल्याने लोक घराबाहेर पडलेच नाहीत. शुक्रवार ते रविवार संपूर्ण गोवा सुनसान राहिला. मार्केट परिसर, दुकाने अन्य व्यवहार पूर्णपणे बंद राहिले. औषधालये, दूध, वर्तमानपत्रे व काही अत्यावश्यक सेवा तेवढय़ा सुरू राहिल्या. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत लॉकडाऊनचे कडकडीत पालन करण्यात आले. सरकारी कार्यालये शनिवार, रविवार बंदच राहतात. त्यामुळे केवळ शुक्रवारी तेवढेच शासकीय कामकाज बंद राहिले.