नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘कोरोनाचे संकट आपल्यासमोर पुन्हा एकदा आ वासून उभे आहे. मात्र, धैर्य, निर्धार आणि नियमपालन या त्रिसूत्रीच्या आधारावर हे आव्हान यशस्वीरित्या केला जाऊ शकतो हे निश्चित आहे. लोकांचे जीव वाचविण्यासमवेतच अर्थव्यवस्थाही प्रगतीपथावर नेणे आपल्यासाठी कर्तव्याचे आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार केवळ अंतिम पर्याय म्हणून केला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी देशवासियांना हा संदेश दिला. एकप्रकारे, लॉकडाऊन केला जाणार नाही, हेच त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे असंख्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या काही राज्यांची सरकारे लॉकडाऊन घोषित करण्याचा विचार करीत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व इतर काही राज्यांच्या मंत्रिमंडळांच्या बैठकाही या संदर्भात होत आहेत. मात्र, अन्य काही उपाय उरला नसेल, तरच लॉकडाऊनचा विचार केवळ शेवटचा पर्याय म्हणून करा, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदींनीच दिल्याने आता ही राज्ये काय करतात, यासंबंधी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अफवांवर विश्वास नको
कोरोनाचे आव्हान मोठे आहे. मात्र, देश व प्रशासन ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे देशवासियांनी आपले धैर्य सोडू नये. तसेच अफवा आणि भ्रम पसरविणाऱयांपासून सावध रहावे. आरोग्य विषयक नियमांचे पालन अत्यंत कसोशीने करावे आणि कोरोनाला हटवावे. असेही प्रतिपादन त्यांनी केले.
स्थलांतरण रोखण्याची सूचना
पुन्हा लॉकडाऊन येणार अशा भीतीपोटी अनेक स्थलांतरीत कामगार आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, राज्य सरकारांनी त्यांना तसे करण्यापासून रोखावे. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यात केंद्र आघाडीवर असून या कामगारांना ते जेथे काम करतात व वास्तव्यास आहेत, तेथे लस देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यांचे काम जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. त्यामुळे स्थलांतरण न करता आहे त्याच स्थानी वास्तव्य कामगारांनी करावे, असे कळकळीचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लसीकरण योजना वेगात
देशाने तीन महिन्यांपूर्वीपासूनच देशव्यापी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपल्या संशोधकांनीं कमीतकमी वेळात आणि रात्रंदिवस प्रयत्न करून प्रभावी आणि जगातील सर्वात स्वस्त लसीची निर्मिती केली. हे त्यांचे कार्य निःसंशय कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आज आपल्याजवळ कोरोना विरोधात लढण्यासाठी परिणामकारक शस्त्र आहे. वेगवान लसीकरणासाठी केंद्राने पावले उचलली आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. देशातील औषध उत्पादन केंद्रे मोठय़ा प्रमाणावर औषधे निर्माण करून परिस्थिती सुसहय़ करीत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
प्राणवायूची आवश्यकता भागविणार
नव्या रूपातील कोरोना माणसाच्या शरीरात प्राणवायूची (ऑक्सिजन) कमतरता निर्माण करतो. परिणामी देशात आज द्रवरूप प्राणवायूची मागणी वाढली आहे. ज्याला आवश्यकता आहे त्या प्रत्येकाला प्राणवायू पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशातील उद्योजकांना प्राणवायूचे उत्पादन वाढविले असून देशाच्या कानाकोपऱयात तो पोहचविण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉक्टर्स, कर्मचाऱयांची प्रशंसा
कोरोनाच्या प्रथम उद्रेकात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा सैनिक, रूग्णवाहिकांचे चालक, पोलीस इत्यादी आघाडीवरच्या कोरोना योद्धय़ांनी महान धैर्य आणि निर्धाराने आपली कर्तव्ये पार पाडली. आज पुन्हा झालेल्या उदेकाच्या काळातही ते आपली घरदारे आणि आप्तस्वकीय यांच्यापासून दूर राहून आपले काम करीत आहेत. त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपण सुरक्षित आहोत, असे भावनात्मक उद्गार त्यांनी काढले.
तरूणांचा सहभाग महत्वाचा
कोरोनाशी युद्धात यश मिळविण्याच्या कामी तरूणांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात असणे अपेक्षित आहे. तरूणांनी आपल्या संस्था, इमारती, सोसायटय़ा, आपली घरे इत्यादी स्थानी आपले नातेवाईक व परिचितांकडून मास्कचा उपयोग आणि शारिरीक अंतर आदी नियमांचे पालन करून घेण्यात पुढाकार घ्यावा. तसे केल्यास देशव्यापी पातळीवर नियमांचे पालन होऊन लॉकडाऊनची आवश्यकताच उरणार नाही. तरूणांप्रमाणे बालकांनी व मुलांनीही आपल्या घरांमध्ये नियम पाळण्याची व पाळून घेण्याचे काम करावे, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
बॉक्स
त्रिसूत्रंाrचा उपयोग निर्णायक ठरणार कोरोना उद्रेक संपविण्यासाठी धैर्य, निर्धार आणि नियमपालन या त्रिसूत्रीचा उपयोग प्रत्येकाने कोणतेही निमित्त न सांगता केला पाहिजे. त्याच्या जोडीला लसीकरण आणि ज्येष्ठ नागरीक व लहान मुले यांना साहाय्याचा हातही देणे आवश्यक आहे. अशा साध्या उपायांमुळे आपण कोरोनाची साखळी तोडून त्याला हटवू शकू, हे निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.