प्रतिनिधी/मुंबई
कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमावर १५ ते ३० एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन असावा यात कोणाचेही दुमत नाही. मात्र पहिल्या लॉकडाऊनचा अनुभव घेता सामान्य माणसांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना पॅकेज देण्याबाबत आग्रही मागणी आहे. विरोधी पक्षांची पॅकेजची मागणी आहेच, पण सत्ताधार्यांमधील काँग्रेसची विशेषत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी आहे. त्याचे नियोजन कसे करावे, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संभाव्य लॉकडाऊन लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असून यावेळी निर्णय जाहीर होऊ शकतो.
आर्थिक पॅकेज हीच अडचण
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड लॉकडाऊननंतर काही दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करावा यासाठी शनिवारी सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली. त्याबैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह काँग्रेसनेही संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला. सर्वसामान्य वर्गाला आर्थिक पॅकेज हा तेथे कळीचा मुद्दा ठरला. मात्र कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मुख्यमंर्त्यांचे म्हणणे पडले. त्यानंतर रविवारी टास्क फोर्सच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी आणि आरोग्य खात्याचे मंत्री यांचाच समावेश होता.
टास्क फोर्सबाबत उपाययोजनांवर जोर
टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावरच जास्त चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. म्हणजे लॉकडाऊन झाल्यास कोरोना साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णांवर उपचारासाठी काय उपाययोजना करता येतील यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ञांच्या मताला मुख्यमंर्त्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन आणि त्यानंतर एक एक गोष्ट हळू हळू शिथील करण्याची भूमिका मुख्यमंर्त्यांची आहे. मात्र उद्याचा (13 एप्रिल) गुडीपाडवा हा हिंदु संवत्सरातला पहिला दिवस आणि त्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल) जयंती यामुळे संपूर्ण लॉकडाऊन दोन दिवस लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दिवसांना लॉकडाऊन झाला असता तर लोकमत सरकारच्या विरोधात गेले असते. त्यामुळे 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 15 एप्रिलपासून मुख्यमंत्री लॉकडाऊन जाहीर करतील असे बोलले जात आहे.
अठरा दिवसांचा लॉकडाऊन
चौदा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यास त्याची मुदत 28 एप्रिलला संपत आहे. त्यानंतर शनिवार 1 मे महाराष्ट्र दिन आणि रविवार 2 मे हा आठवडÎाच्या सुट्टीचा दिवस असल्याने 15 दिवस लॉकडाऊनमध्ये अडकलेले लोक मोकळीक मिळताच मोकाट सुटतील आणि पुन्हा कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने हा लॉकडाऊन शनिवार -रविवार धरून अठरा दिवसांचा असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.