सध्या
कोरोना विषाणूचा धुमाकूळ युरोप, अमेरिकेच्या तुलनेत कमी असला, तरी भारतातही तो हळूहळू
उग्र रूप धारण करू लागला असून त्याला रोखण्यासाठी संपूर्ण देशात जाहीर करण्यात आलेला
लॉकडाऊन आता आणखी वाढण्याची शक्यता स्पष्ट दिसू लागली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक समस्या
निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा कधी नव्हे ती ठप्प झाली असून अनेक व्यवसाय-उद्योग
हे बंद पडलेले आहेत आणि आधीच अर्थव्यवस्थेवर जे मंदीचे सावट दाटून आले होते ते आणखी
खूपच गडद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. लोक रोजगार गमावून बसण्याची भीती व्यक्त
होत आहे. मात्र महामारी आणि त्याअनुषंगाने पुकारण्यात आलेला लॉकडाऊन याच्या नकारात्मक
परिणामांच्या वृत्तांची गर्दी झालेली असताना या परिस्थितीचे काही चांगले परिणामही दिसू
लागले आहेत. हे चांगले परिणाम बव्हंशी वातावरणात, निसर्गात दिसून येत आहेत. जशी कधीही
न थांबणारी महानगरे सुनसान झाल्याचे, जिथे-तिथे रस्ते ओस पडलेले वा रेल्वेमार्गावर
गाडय़ा धावत नसल्याचे कधीही न पाहिलेले दृष्य पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपल्या
अवतीभवती कधीही न पाहिलेल्या गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत. लोक जीव मुठीत धरून कोरोनाच्या
धास्तीपोटी आणि अत्यावश्यक खबरदारी म्हणूनही घरात बसलेले असताना वसुंधरा मात्र प्रदूषणाची
बाधा कमी झाल्याने एक वेगळेच सुखद चित्र दाखवू लागली आहे… पंजाबातून दिसू लागली हिमालयाची
शिखरे…
भारताच्या उत्तेरकडील पंजाब राज्यातील लोकांवर सध्या सुखद धक्का सहन करण्याची पाळी आली आहे. कारण तेथील काही प्रांतांतील नागरिकांना कधी नव्हे ते हिमालयाच्या पांढऱयाशुभ्र शिखरांचे दर्शन घडू लागले आहे. खरे तर हिमालय तेथून 100 मैल दूर अंतरावर आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषण कमी होऊन हवा स्वच्छ झाल्याने हा नयनरम्य नजारा दिसू लागला आहे. आपल्या घरातून दिसणाऱया हिमशिखरांची छायाचित्रे जालंधर शहर व सभोवतालच्या भागांतील लोकांनी समाजमाध्यमांवर टाकलेली आहेत. गेली काही वर्षे नव्हे, तर कित्येक दशकांपासून असे चित्र कधी पाहिले नव्हते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यातील एका व्यक्तीने म्हटले आहे, ‘मागील तीस वर्षांत मी पहिल्यांदाच असा नजारा पाहत आहे. हिमशिखरे स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत कारण प्रदूषण घटलेले आहे. खरेच हे अद्भूत आहे’.
जालंधरची पालटली हवा...
गेल्या काही आठवडय़ांत हवा ज्या प्रमाणात स्वच्छ झाली त्याने ही किमया घडवून आणली आहे. बंद झालेले कारखाने, रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक तसेच बंद झालेली विमान सेवा हे सारे घटक यास कारणीभूत आहेत. जालंधरमध्ये हा परिणाम कसा घडून आलेला आहे ते देशाच्या राष्ट्रीय निर्देशांकाची आकडेवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. त्यानुसार राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर 17 पैकी 16 दिवस हवा ‘चांगली’ राहिलेली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास एकही दिवस हवेचा दर्जा ‘चांगला’ राहू शकला नव्हता आणि यंदाच्या मार्च महिन्यातील पहिल्या 17 दिवसांतील आढावा घेता या शहरातील हवा केवळ तीन दिवस ‘चांगल्या’ गटात समाविष्ट झाल्याचे दिसून येते…
नीळे आकाश पाहून राजधानी हरखली
गेल्या महिन्यात जगातील सर्वांत मोठय़ा लॉकडाऊनची भारतात सुरुवात झाली आणि त्यासरशी दिल्लीतील चित्र बदलण्यास सुरुवात झाली. रस्त्यावरील वाहतूक जवळजवळ शून्यवत, वातावरणात काळा धूर सोडणारे कारखाने बंद आणि नेहमी कार्यरत राहणारी तसेच आसमंतात धूळ व सिमेंटचे कण पसरविणारी बांधकामाची स्थळेही बंद अशी स्थिती असल्याने दिल्लीवासियांना कधी नव्हे तो स्वच्छ हवेचा अनुभव घेण्याची संधी मिळू लागली आहे. एरव्ही येथील लोकांना आकाशाकडे पाहिल्या राखाडी रंगाचे आकाश पाहायला मिळायचे. आता कधी नव्हे ते नीळे गगन पाहायला मिळू लागले असून त्यामुळे हरखून गेलेल्या दिल्लीवासियांनी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे.
दिल्लीवासीय घेताहेत स्वच्छ हवेचा अभूतपूर्व आनंद
दिल्लीतील प्रदूषण हा एरव्ही नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिलेला आहे. जगातील अत्यंत खराब व प्रदूषित हवा असलेल्या ठिकाणांमध्ये नवी दिल्लीचा समावेश होतो. गेल्या वर्षी विविध देशांच्या सर्वांत प्रदूषित राजधान्यांमध्ये दिल्लीला प्रथम स्थान प्राप्त झाले होते. दरवर्षी हिंवाळय़ात उत्तर भारतातील काही राज्यांतील शेतजमिनीतील आगीचा धूर असा काही या महानगरात भरत असतो की, तो येथील लोकांना त्राही भगवान करून सोडतो. त्यावेळी प्रदूषणाचे प्रमाण 900 च्या वर जात असते. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा 20 पटींनी जास्त असे हे प्रमाण आहे. त्यामुळे विमानतळ बंद ठेवण्याची तसेच शाळा बंद ठेवण्याची पाळी येते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाच प्रकार होऊन कित्येक दिवस पिवळय़ा धुक्याची चादर कायम राहिली होती. त्यावेळी हवेचे प्रदूषण विक्रमी स्तरावर पोहोचले होते आणि त्यामुळे शाळा बंद कराव्या लागून विमाने अन्यत्र वळवावी लागली होती. याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावरही उतरले होते. मात्र दिल्लीचे चित्र आता काही तरी वेगळेच सांगत आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाल्यावर मार्च महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक 45 इतका खाली आला. गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीचा विचार करता तो 160 इतका होता.
लॉकडाऊन झाल्यापासून दिल्लीतील तसेच उपनगरांतील लोक ‘चांगल्या’ दर्जाच्या हवेचा आनंद घेत आहेत. असा आनंद घेण्याची संधी त्यांना गेल्या काही वर्षांत अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या वेळा मिळाली आहे. हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत जे तीन प्रमुख घटक विचारात घेतले जातात ते ‘पीएम 2.5’, ‘पीएम 10’ आणि ‘एनओक्स’ हे चक्क 50 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱया ‘सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) या यंत्रणेच्या विश्लेषणात दिसून आल्याप्रमाणे वरील तीन घटकांमध्ये सर्वाधिक घट ही दिल्लीत पाहायला मिळालीय. तेथे मार्चच्या दुसऱया आठवडय़ाची एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ाशी तुलना केली असता ‘पीएम 2.5’ हा घटक 62 टक्क्यांनी, ‘पीएम 10’ 57 टक्क्यांनी, तर ‘एनओएक्स’ 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले…
गंगा-यमुनाही झाल्या स्वच्छ
लॉकडाऊनचा चांगला परिणाम देशातील गंगा-यमुना यासारख्या मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झालेल्या नद्यांवरही झाला आहे. उद्योगांमुळे होणारे प्रदूषण व उद्योगांतून सोडले जाणारे सांडपाणी, लोकांकडून केली जाणारी आंघोळ, फेकली जाणारी फुले हे सर्व थांबल्याने यमुनातील पाण्याचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले आहे. दिल्ली जल मंडळाच्या उपाध्यक्षांनीही याला दुजोरा दिला आहे. यमुनाचे पाणी स्वच्छ झाल्याने कित्येक पर्यावरणतज्ञांसह लोकही हरखून गेले आहेत. हीच बाब गंगेची आहे. गंगेच्या सफाईसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोदी सरकारने घेतलेला आहे. शेकडो कोटी रुपये त्यावर खर्च झाले आहेत. मात्र त्यांनाही जे जमले नव्हते ते या लॉकडाऊनने घडवून आणले असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. पर्यावरणतज्ञांच्या अनुसार, हरिद्वार, ऋषिकेशमध्ये गंगेचे पाणी खूपच स्वच्छ झाले असून ते बऱयाच कालावधीनंतर आचमनासही योग्य झाले आहे. उद्योगांचे तसेच धर्मशाळा, हॉटेल्स यांचे गंगेत मिसळणारे सांडपाणी 500 टक्के कमी झाल्याने हे चित्र पाहायला मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 24 मार्चपासून गंगेच्या पाण्याचा दर्जा 40 ते 50 टक्क्यांनी सुधारल्याचे मानले जात आहे.
85 हून अधिक शहरांतील प्रदूषणात घट
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे देशातील दिल्लीसह 85 हून अधिक शहरांतील प्रदूषणाचा स्तर घटला आहे, तर ‘आयक्यूएअर’प्रमाणे 20 सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये आता भारतातील केवळ दोनच शहरांचा समावेश होत आहे. सहसा हवेतील प्रदूषणाच्या बाबतीत ‘पीएम 2.5’ (2.5 मायक्रोमीटर्सहून कमी व्यासाचे वातावरणातील कण), ‘पीएम 10’ (10 मायक्रोमीटर्सहून कमी व्यासाचे कण) आणि ‘एनओएक्स’ म्हणजे (वाहनांतून सोडला जाणारा ‘नायट्रोजन ऑक्साईड’) हे तीन घटक विचारात घेतले जातात. ते अत्यंत घातक असतात आणि त्यामुळे श्वसन प्रक्रियेशी निगडीत गंभीर विकार होऊन शकतात. केंद्राच्या ‘सफर’ या यंत्रणेकडून करण्यात आलेल्या विश्लेषणात दिल्लीप्रमाणे मुंबई, पुणे व अहमदाबाद येथेही तशीच चांगली स्थिती दिसून आलेली आहे. या सर्व ठिकाणी मार्चच्या दुसऱया आठवडय़ाची तुलना एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ाशी करण्यात आलेली आहे. त्यात दिसून आल्याप्रमाणे तिन्ही महानगरांनी या घटकांमध्ये भरीव घट दाखवून दिलेली आहे.
संकलन : लक्ष्मण प्रभू