ऑनलाइन टीम / हैदराबाद :
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील लॉक डाऊन चा कालावधी तीन जून पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. देशातील लॉक डाऊन 14 एप्रिल रोजी संपत आहे त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर यांनी ही मागणी केली आहे.
चंद्रशेखर म्हणाले की, लॉक डाऊन चा कालावधी वाढवावा अशी माझी विनंती आहे. कारण आता आपल्या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. आत्ता या स्थितीत लोकांचे जीव वाचणे महत्त्वाचे आहे. आधी आपल्याला लोकांचे जीव वाचवायला हवेत आणि मग अर्थव्यवस्था वाचवता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे. तरीही देशात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचाही आकडा वाढत आहे. त्यामुळे लॉक डाऊन वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात सूचना मागितल्या होत्या.
चंद्रशेखर राव म्हणाले, या लॉक डाऊन चा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तेलंगणामध्ये दर दिवशी 430 ते 450 कोटींचे नुकसान होत आहे. असे असले तरी सध्या आपल्या देशात गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाचा विळखा वाढत आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लॉक डाऊन शिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंती चंद्रशेखर यांनी केली आहे.