ऑनलाईन टीम / मुंबई :
अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे यासाठी राज्यात काही ठिकाणी झोन नुसार शिथिलता आणली आहे. पण याचा अर्थ लॉक डाऊन संपला आहे असा होत नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी सुरू ठेवत आपले क्षेत्र 31 मे पर्यंत ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे चित्र आहे. हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल आणि लॉक डाऊन चे अधिक कठोर पणे पालन करण्यावर भर द्यावा. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कोणी संसर्ग पसरवता याची काळजी घेतली पाहिजे. तसेच जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोर नियम पाळूनच होईल, हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.