ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चार चरणात सुरू असलेले लॉक डाऊन पूर्णपणे फेल झाले असल्याचा आरोप लावला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आपण 21 दिवसात कोरोना व्हायरस वर मात करू. मात्र, आता 60 दिवस होत आले आहेत आणि संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालला आहे. लॉक डाऊन काढलाही जात आहे. पण लॉक डाऊनचा हेतू पूर्णपणे फेल ठरला आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता त्यांची पुढील रणनीती काय आहे याबाबत माहिती द्यावी, तसेच लॉक डाऊनला आपण कशा प्रकारे पाहता? गरीब, मजूर आणि एमएसएमई ची कशा प्रकारे मदत करणार? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.
पुढे ते म्हणाले, आम्ही काँग्रेसशासित प्रदेशात गरिबांना पैसे आणि भोजन देत आहोत. आणि आम्हाला माहिती आहे, पुढे काय करायला हवे. पण राज्य किती काळ एकटेच लढाई लढतील? केंद्राला पुढे येऊन नियोजनासंबंधित सांगावे लागेल, असे ही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.