ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. तरी देखील कोरोनाची स्थिती आटोक्यात आली नाही आहे, त्यामुळे लॉक डाऊन 4 ची घोषणा केली आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये शिथिलता हवी, काय सुधारणा हवी याबाबतच्या सूचना व्हाट्सॲप फोन आणि ईमेलद्वारे कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मागील 29 तासात जवळपास 5.48 लाख सूचना लोकांनी केल्या आहेत.
यामध्ये व्हाट्सअप वर 4.76 लाख, ई-मेल द्वारे 10 हजार, फोनवर 39 हजार आणि चेंज डॉट ओआरजी वर 27 हजार 700 सूचना दिल्या आहेत.
याबाबत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सुचनांमध्ये परिवहन, उद्योग, कारभार आणि स्कूल – कॉलेजबाबत चांगल्या सूचना आल्या आहेत. लोकांकडून आलेल्या सूचनांची विशेषज्ञ आणि डॉक्टरांबरोबर चर्चा करून सल्ला घेतला जाईल आणि शुक्रवारपर्यंत याचा रिपोर्ट तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.