शासनाने तातडीने हॉटेल, बार, खानावळ सुरू करण्याची खाद्यपेय विक्रेता संघाची मागणी
प्रतिनिधी / सांगली
राज्यात काही अटी व नियम घालून लॉज सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. पण, ही परवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, परमिटबार रूम हे सुरू करण्यासाठी देण्यात आली नाही. फक्त लॉजमधील ग्राहकांना जेवण देण्यासाठी रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. इतर हॉटेल सुरू करण्याचे नाही, असा स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल आजपासून सुरू होणार नाहीत.
सांगली जिल्हय़ात परमिट बार, लॉज, हॉटेल, ढाबे आणि खानावळ यांची जवळपास दोन हजारांहून अधिक संख्या आहे. यामध्ये 455 परमिटबार रूम आहेत. शासनाकडून फक्त यामधील लॉजलाच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे इतर सर्व हॉटेल चालकांच्यावर अन्याय झाला असून त्यांनाही हॉटेल सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा खाद्यपेय विक्रेता संघाच्यावतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जयंत पाटील यांनी शासनाकडून प्रत्येकांना परवानगी मिळणार आहे. पण ही टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात फक्त लॉज आणि लॉजमध्ये येणाऱया ग्राहकांसाठी रेस्टॉरंट सुरू केले जाणार आहे.
लॉजसाठीही मोठय़ा प्रमाणात अटी
लॉजमधील फक्त 33 टक्केच खोल्या भाडय़ाने देता येणार आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर दर्शनी भागात लावण्यात यावेत हॉटेल पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरितीने नियोजन करण्यात यावे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात येणारी वर्तुळे आखण्यात यावीत. प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक केले आहे. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास लावण्यात यावी. पायाने वापरता येणारे पेडल सॅनिटायजर ठेवण्यात यावा, हॉटेल कर्मचाऱयांनी मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज याचा वापर करावा. लॉजमध्ये राहिलेल्या व्यक्तींनाच त्यांच्या रूममध्ये रेस्टॉरंटमधील जेवण देण्यात यावे असे आदेश दिले आहेत.
पार्सल सेवा सुरूच राहणार
सर्व हॉटेलना सकाळी नऊ ते पाच यावेळेत जेवण पार्सल देण्याची सेवा तशीच सुरू ठेवली आहे. त्यामध्ये काहीही बदल केला नाही. पण, हॉटेलमध्ये बसून अद्यापही जेवण देता येणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. परमिटबार रूममधील दारूचीही पार्सलने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल तातडीने सुरू होण्याची गरज : रमेश शेट्टी
गेल्या साडेतीन महिन्यापासून हॉटेल, खानावळ, परमिटबार रूम बंद आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांना याचा फार मोठा फटका बसला आहे. याठिकाणी असणाऱया कामगारांचे हाल सुरू आहेत. शासनाने आता लॉज सुरू करण्यासाठी काही नियम व अटी घालून परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे नियम व अटी घालून त्यांनी हॉटेल, खानावळ, बार यांना परवानगी दिली तर साडेतीन महिन्यापासून बंद असलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. शासनाने हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे खाद्यपेय विक्रेता संघानी केली आहे अशी माहिती संघटनेचे सचिव रमेश शेट्टी यांनी दिली.