खानापूर / प्रतिनिधी
सोमवार पेठ-हळबवाडा लोंढा (ता. खानापूर) येथील पती-पत्नीचे चार दिवसांच्या अंतराने आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या चार मुलींचे मायेचे छत्र हरपले आहे. विशेष म्हणजे सर्वात लहान मुलगी अवघ्या दहा महिन्यांची असल्याने मुलीच्या पालन-पोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शुक्रवार दि. 11 रोजी मनीषा मनोज हणबर (वय 26) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना चार मुली आहेत. पत्नीच्या निधनाचा धक्का बसल्याने पती मनोज विठ्ठल हणबर (वय 34) यांना मुलींच्या पालन-पोषणाच्या चिंतेने ग्रासले. पत्नीच्या निधनानंतर पती मनोज हवालदिल झाले होते. लहान-लहान मुलींचे आईविना कसे होणार या विचारात ते गावात एकाकी फिरत होते. सोमवार दि. 14 रोजी लोंढा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रक ओलांडताना त्यांना रेल्वेची धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दीड तास त्या ठिकाणी पडून राहिल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. रुग्णवाहिकेतून त्यांना बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवार दि. 15 रोजी त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांच्या अंतराने आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्याने वृद्ध आजी-आजोबावर चार मुलींच्या पालन-पोषणाची जबाबदारी पडली आहे. या घटनेमुळे लोंढा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांनी या मुलींच्या पालन-पोषणासाठी मदतीचा हातभार लावावा, अशी मागणी केली जात आहे.
लोंढय़ातील रुग्णवाहिका गेली कुठे?
सोमवारी रेल्वेची धडक बसल्यानंतर मनोज दीड तास त्याच ठिकाणी पडून होते. खानापूर रुग्णवाहिका येईपर्यंत बराच वेळ वाया गेला. तोपर्यंत अती रक्तस्राव होऊन मनोज बेशुद्ध झाले होते. गेल्या काही दिवसांपासून लोंढय़ाच्या दवाखान्यातील रुग्णवाहिका अन्यत्र नेण्यात आल्याने परिसरातील रुग्णांचे हाल होत आहेत. रेल्वेमार्ग, बेळगाव-गोवा महामार्ग, रामनगरöधारवाड राज्य महामार्ग या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असतात. अशा वेळी रुग्णवाहिकेची तातडीने गरज भासते. ही गरज ओळखून लोंढा दवाखान्याला कायमस्वरुपी रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.