आसाम विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये 40 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. हे मतदारसंघ लोअर आसाममधील आहेत. येथून भाजपचे दिग्गज नेते हेमंत विश्व शर्मा, त्यांचे मंत्रिमंडळातील 5 सहकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास समवेत 337 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. येथे मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. सत्तारुढ भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.
ध्रूवीकरणाचे राजकारण
लोअर आसाममध्ये ध्रूवीकरणाची स्थिती आढळून आली आहे. धर्माच्या आधारावर मतदान झाले असण्याची शक्यता आहे. हिंदू समुदाय भाजप तर मुस्लीम काँग्रेस आघाडीसोबत गेल्याची धारणा आहे. लोअर आसाममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी (महाजोत)ला राज्यात प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. लोअर आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. त्यानंतर बोडो-कचारी यासारखे जातीय समुदाय देखील आहेत.
भाजपचा प्रभाव तुलनेत कमी
काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमर यांचा एआययुडीएफ येथे यापूर्वी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना भाजपने या क्षेत्रात काही जागा जिंकल्या होत्या. 2016 मध्ये बिलासिपारा मतदारसंघात भाजपने 35 टक्के मतांसह विजय मिळविला होता. तर काँग्रेस आणि एआययुडीएफच्या एकूण मतांचे प्रमाण 58 टक्के होते. राज्यात भाजपच्या वर्चस्वानंतरही 2016 च्या निवडणुकीत लोअर आसामच्या 40 विधानसभा जागांपैकी 15 ठिकाणी रालोआला यश मिळविता आले नव्हते. अशाचप्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआ केवळ 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर होती.
लोअर आसामचे राजकारण
बोडोलँड क्षेत्र प्रामुख्याने उत्तर आसाममध्ये ब्रह्मपुक्षा नदीच्या सखल भागात आहे, यात कोक्राझार, चिरांग, दारंग, बोंगाईगाव, बक्सा, नलबाडी आणि उदगुरु सामील आहे. हे भाग नव्या सरकारच्या स्थापनेत निर्णायक भूमिका बजावतील. येथील बोडोलँड पीपल्स प्रंट हा क्षेत्रातील एकमात्र राजकीय पक्ष होता. पण 2020 च्या बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राच्या निवडणुकीत युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल हा भाजपचा घटक पक्ष राहिला होता.
सामुदायिक संघर्ष
पण या क्षेत्रात बोडो आणि मुस्लीम यांच्यात हिंसक संघर्ष होत राहिला आहे. दोन्ही समुदायांदरम्यान तणाव राहिला आहे. बोडोंनी गोसाईगावात मुस्लिमांची घरे पेटविल्याचा आरोप 2012 मध्ये झाला होता. ही घटना आसाममध्ये टर्निंग पॉइंट ठरली होती. या घटनेनंतर एआययुडीएफ मुस्लिमांना समर्थन करत असल्याचे लोक मानू लागले. तर बोडो बीपीएफसोबत आहेत. यंदाही पक्ष सर्व 12 जागांवर निवडणूक लढवत आहे.