ऑनलाईन टीम / पुणे :
माझ्या चित्रपटात लोककलेचा मोठा भाग असतो. अभंग, गोंधळ, जोगवा अनेक गाजलेली गीते ही लोककलेचा आधार असलेली आहेत. चित्रपटांमध्ये लोककलांचा समावेश करण्याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, चित्रपटातून येणाऱ्या गोष्टींना ग्लॅमर असते आणि त्याचा प्रसार वेगाने होतो. म्हणून लोककला चित्रपटात घेतली जाते. लोककलेचा प्रसार करण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम आहे. असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणेच्या वतीने शाहीर हिंगे युवा कला गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. फतेहशिकस्त चित्रपटाचे पार्श्वगायक अवधूत गांधी यांना शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मधुरा गांधी, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीरा प्रा. संगीता मावळे उपस्थित होते. शाहिरी फेटा, मोत्याचा शिरपेच, स्मृतीचिन्ह व रोख रुपये 11 हजार असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्काराचे यंदा 21 वे वर्ष आहे.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, वारकरी कीर्तनातील संगीत हा चिंतेचा विषय झाला आहे. आज चित्रपटातील गाण्याच्या चाली भजनाला लावल्या जातात. वारकरी संगीताला आचारसंहिता आणि समृद्ध वारसा आहे, तो जपला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अवधूत गांधी व सहकाºयांचा भक्तीगीतांचा विशेष कार्यक्रम सादर झाला. शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.