नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ याचा चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. चिराग पासवान यांनी घडलेल्या प्रकारवार मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी भावनिक ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा आई समान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो, असे म्हणत त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत.
लोक जनशक्ति पार्टीतील अंतर्गत कलहामुळे चिराग पासवान यांना फटका बसला आहे. लोक जनशक्ति पार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचं लोकसभेतील संसदीय पक्षाचं नेतेपद गेलं आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पाच खासदारांनी केली होती.