लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची माहिती
सोसायटीविरोधात तिन्ही राज्यात एकही तक्रार नाही
प्रतिनिधी/ पणजी
लोकमान्यचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक असून रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती झालेल्या या संस्थेला गेल्या 25 वर्षांत सर्वसामान्यांकडून आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. त्यामुळेच ‘लोकमान्य’ ही आज भारतातली पहिल्या क्रमांकाची आदर्श सोसायटी बनलेली आहे. जनसहभागातून ज्या झपाटय़ाने या सोसायटीची वाढ झाली त्यातून रु. 5 हजार कोटींच्या ठेवीपर्यंत मजल मारलेली आहे, असे निवेदन करुन लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी सर्व ग्राहकांचे आभार मानले आहेत.
लोकमान्य सोसायटी 2002 मध्ये मल्टिस्टेट बनली. 2006 मध्ये ती मल्टिपर्पज सोसायटी बनली. अलिकडच्या काळात काही उपद्व्यापी लोकांनी अनेक अफवा उठविल्या. विशिष्ट हेतूने गैरसमज पसरविला परंतु त्याचे आता निराकारण झालेले आहे. लोकमान्य विरुद्ध कोणत्याही ग्राहकाची तक्रार नाही व तसे प्रमाणपत्र सहकार खात्याच्या कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्याच्या अधिकाऱयांनी दिलेले आहे. त्यातून जनतेचा विश्वास आता अधिकच वृद्धिंगत झालेला आहे. ही संस्था गुंतवणुकदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे. भविष्यातही गुंतणवणुकदारांना मोठी संधी असल्याचे किरण ठाकुर म्हणाले.
कणकुंबी – जांबोटी परिसरातील तीस गावांचा आर्थिक विकास – संकल्प
कणकुंबी, जांबोटी परिसरातील सुमारे 30 गावे आम्ही दत्तक घेतली आहे. सुसज्ज करण्याचे एक स्वप्न व ध्यास म्हणून या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाची प्रगती व आर्थिक ताकद वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. त्या गावातील मुलांना, तरुणांना सर्वांनाचा विविध प्रशिक्षणे देणे, त्यांना नोकऱया मिळवून देणे, शेती, बागायतींमधून आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांना मदत करणे, तेथील प्रत्येक घराचे मासिक उत्पन्न किमान रु. 50 हजार व्हावे या करिता लोकमान्यचा प्रयत्न आहे. आवश्यक ते व्यावसायिक प्रशिक्षण, शिवाय त्यांच्या शेतमालाला वा उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम लोकमान्य करील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास देशातील काही भागात हा मॉडेल म्हणून राबविण्याचा इरादा किरण ठाकुर यांनी व्यक्त केला
‘लोकमान्यत’र्फे अनेक संस्था, उपक्रमांना भरीव मदत
‘लोकमान्य’मार्फत आम्ही बेळगाव, गोवा, कोकण, सांगली, सातारा, पुणे, मुंबई आदी विविध भागात अनेक योजना चालू केलेल्या आहेत. त्यात महाविद्यालय स्थापन करणे, रिसॉर्टला फायनान्स करणे, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक, मंगल कार्यालय सुरू करणे, क्रीडा उपक्रम, वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणे, अनेक संस्थांना भरीव देणग्या देणे, आदर्शवत संस्थांना मदत करणे, यासारख्या असंख्य योजनांचा उल्लेख करता येईल, असे श्री. ठाकुर पुढे म्हणाले.
‘लोकमान्य’ ही एक राष्ट्रनिर्माणाची योजना आहे. त्याद्वारे जवळजवळ दोन हजार लोकांना थेट रोजगार, सुमारे 50 हजार कुटुंबे या लोकमान्य सोसायटीवर अवलंबून आहेत. खास करून गोव्यात सोसायटीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लोकांनी आमच्यावर भरभरून विश्वास दाखवला, सहकार्य केले. त्याद्वारे आता देशाला एक आदर्श मॉडेल द्यावा, हा त्यामागील उद्देश आहे.
‘तरुण भारत’च्या संपादकांनी चालवलेले सामाजकार्य
तब्बल 101 वर्षांचा इतिहास असलेल्या तरुण भारत या दैनिकाच्या संपादकांनी चालविलेले हे समाजकार्य आहे. दै. तरुण भारतचे संस्थापक संपादक बाबुराव ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे काम केले होते. सामाजिक चळवळीत तसेच राजकारणातही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत किरण ठाकुर यांनीही राजकारण, आर्थिक, समाजकारण, शिक्षणक्षेत्रात सर्व दृष्टीनी वाढता आलेखच ठेवला आहे. यामुळेच एकप्रकारचे उत्साहाचे वातावरण दिसून येते. कोरोनाच्या काळातसुद्धा आमच्या लोकांनी जे सहकार्य केले, आम्ही सर्वसामान्य लोकात विश्वास निर्माण केला, त्याचे मी जाहीरपणे कौतुक करतो, असे श्री. ठाकूर म्हणाले.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या उत्तर गोव्यातील शाखांच्या व्यवस्थापकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत किरण ठाकुर यांनी वरील माहिती दिली.
कोरोनाच्या महासंकटातसुद्धा लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीवर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि त्यातून सोसायटीने घेतलेली भरारी पाहून आपण भारावून गेलो असून त्याबद्दल सर्व ग्राहकांचे आभार व्यक्त करतो, असे श्री. ठाकुर यांनी पुढे सांगितले.
कणकुंबी येथे उभारणार मोठे रेस्टॉरंट
पुढील 25 वर्षांच्या काळात अनेक योजना आमच्यापुढे आहेत. त्याद्वारे ही संस्था उत्तरोत्तर वाढत जाईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ग्रामोद्योगाला आम्ही स्थान देत आहोत. लोकांचे कौटुंबिक उत्पन्न वाढविण्याचेही आमचे प्रयत्न आहेत. कणकुंबी या गावात आम्ही मोठे रेस्टॉरंट उभे करतो. तेथे 25-30 लोकांना काम मिळेल, व त्याद्वारे अन्य कित्येक कुटुंबांना काम मिळणार आहे. परंतु सरकारी अडथळ्यामुळे ते काम सध्या रखडलेले आहे. तरीही अनेक कुटुंबांना आमचा आधार राहील, त्यांना स्कील ट्रेनिंग देण्यात येईल, नोकरी उद्योग मिळवून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी लोकमान्य सोसायटी प्रयत्न करणार आहे.
गोव्यातही विविध सार्वजनिक कामांना प्राधान्य देणार
गोव्यातही आम्ही अनेक सार्वजनिक कामांना प्रोत्साहन देणार आहोत. कोविडसाठी आम्ही मुख्यमंत्री निधीला 11 लाख रुपये दिले. तसेच गोव्यातून 2000 कीट विकत घेण्यास मदत करुन पुणे येथे पोहोचविण्यासाठी 10 लाख दिले, अशी माहिती श्री. ठाकुर यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी लोकमान्यतर्फे लागू करण्यात आलेल्या ’लॉयल्टी कस्टमर’, ’सिल्वर ज्युबिली’, ’कोविड विमा’, या सारख्या विविध योजनांचीही माहिती दिली.