लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची माहिती : सोसायटीविरोधात तिन्ही राज्यात एकही तक्रार नाही
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने अनेक संकटांचा सामना केला, अनेक आरोप सहन केले, बदनामी सहन केली, तरीही प्रत्येक वेळी आम्ही नव्या जोमाने पुनः भरारी घेतली. अनेकांनी अफवा पसरवून सोसायटीची बदनामी करण्याचे प्रयत्न केले, षडयंत्रे रचली, परंतु आजपर्यंत एकही लेखी आरोप झालेला नाही, हे वैशिष्ठय़ आहे. त्यासंबंधी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सहकार निबंधकांकडून प्राप्त प्रमाणपत्रे आमच्याकडे आहेत, त्यावरून ही संस्था गुंतवणुकदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे, हेच सिद्ध होत असून भविष्यातही गुंतवणुकदारांना मोठी संधी आहे, असे प्रतिपादन सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या उत्तर गोव्यातील शाखांच्या व्यवस्थापकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत किरण ठाकुर यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या महासंकटातसुद्धा लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीवर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि त्यातून सोसायटीने घेतलेली भरारी पाहून आपण भारावून गेलो असून त्याबद्दल सर्व ग्राहकांचे आभार व्यक्त करतो, असे श्री. ठाकुर यांनी पुढे सांगितले.
‘लोकमान्य’ देशातील प्रथम क्रमांकाची सोसायटी
लोकमान्यचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ असून गेल्या 25 वर्षात सर्वसामान्यांकडून आम्हाला आशीर्वादच प्राप्त झालेले आहेत. त्यामुळेच लोकमान्य ही भारतातील प्रथम क्रमांकाची सोसायटी बनलेली आहे. ज्या झपाटय़ाने या सोसायटीची वाढ झाली त्यातून देशासाठी ती एक उदाहरण ठरलेले आहे. पाच हजार कोटींच्या ठेवीपर्यंत मजल मारलेली आहे. 2002 मध्ये लोकमान्य मल्टिस्टेट सोसायटी बनली व 2006 मध्ये ती मल्टिपर्पज सोसायटी झाली.
‘लोकमान्यत’र्फे अनेक संस्था, उपक्रमांना भरीव मदत
‘लोकमान्य’मार्फत आम्ही बेळगाव, गोवा, कोकण, सांगली, सातारा, पुणे, मुंबई आदी विविध भागात अनेक योजना चालू केलेल्या आहेत. त्यात महाविद्यालय स्थापन करणे, रिसॉर्टला फायनान्स करणे, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक, मंगल कार्यालय सुरू करणे, क्रीडा उपक्रम, वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणे, अनेक संस्थांना भरीव देणग्या देणे, आदर्शवत संस्थांना मदत करणे, यासारख्या असंख्य योजनांचा उल्लेख करता येईल, असे श्री. ठाकुर पुढे म्हणाले.
‘लोकमान्य’ ही एक राष्ट्रनिर्माणाची योजना आहे. त्याद्वारे जवळजवळ दोन हजार लोकांना थेट रोजगार, सुमारे 50 हजार कुटुंबे या लोकमान्य सोसायटीवर अवलंबून आहेत. खास करून गोव्यात सोसायटीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लोकांनी आमच्यावर भरभरून विश्वास दाखवला, सहकार्य केले. त्याद्वारे आता देशाला एक आदर्श मॉडेल द्यावा, हा त्यामागील उद्देश आहे.
‘लोकमान्य’च्या बदनामीचे सर्व प्रयत्न ठरले फोल
संकटे सर्वांवरच येतात. आमच्यावरही आली. प्राप्तीकर खात्याची धाड पडली, गेल्यावर्षी आमच्यावर हकनाक आरोप करण्यात आले, हल्लीसुद्धा काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीनी लोकमान्यची बदनामी करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. लोकमान्यचा कारभार सुरळीत चाललेला आहे.
‘तरुण भारत’च्या संपादकांनी चालवलेले सामाजकार्य
तब्बल 101 वर्षांचा इतिहास असलेल्या तरुण भारत या दैनिकाच्या संपादकांनी चालविलेले हे समाजकार्य आहे. दै. तरुण भारतचे संस्थापक संपादक बाबुराव ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे काम केले होते. सामाजिक चळवळीत तसेच राजकारणातही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत किरण ठाकुर यांनीही राजकारण, आर्थिक, समाजकारण, शिक्षणक्षेत्रात सर्व दृष्टीनी वाढता आलेखच ठेवला आहे. यामुळेच एकप्रकारचे उत्साहाचे वातावरण दिसून येते. कोरोनाच्या काळातसुद्धा आमच्या लोकांनी जे सहकार्य केले, आम्ही सर्वसामान्य लोकात विश्वास निर्माण केला, त्याचे मी जाहीरपणे कौतुक करतो, असे श्री. ठाकूर म्हणाले.
कणकुंबी येथे उभारणार मोठे रेस्टॉरंट
पुढील 25 वर्षांच्या काळात अनेक योजना आमच्यापुढे आहेत. त्याद्वारे ही संस्था उत्तरोत्तर वाढत जाईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ग्रामोद्योगाला आम्ही स्थान देत आहोत. लोकांचे कौटुंबिक उत्पन्न वाढविण्याचेही आमचे प्रयत्न आहेत. कणकुंबी या गावात आम्ही मोठे रेस्टॉरंट उभे करतो. तेथे 25-30 लोकांना काम मिळेल, व त्याद्वारे अन्य कित्येक कुटुंबांना काम मिळणार आहे. परंतु सरकारी अडथळ्यामुळे ते काम सध्या रखडलेले आहे. तरीही अनेक कुटुंबांना आमचा आधार राहील, त्यांना स्कील ट्रेनिंग देण्यात येईल, नोकरी उद्योग मिळवून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी लोकमान्य सोसायटी प्रयत्न करणार आहे.
गोव्यातही विविध सार्वजनिक कामांना प्राधान्य देणार
गोव्यातही आम्ही अनेक सार्वजनिक कामांना प्रोत्साहन देणार आहोत. कोविडसाठी आम्ही मुख्यमंत्री निधीला 11 लाख रुपये दिले. तसेच गोव्यातून 2000 कीट पुणे येथे पोहोचविण्यासाठी 10 लाख दिले, अशी माहिती श्री. ठाकुर यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी लोकमान्यतर्फे लागू करण्यात आलेल्या ’लॉयल्टी कस्टमर’, ’सिल्वर ज्युबिली’, ’कोविड विमा’, या सारख्या विविध योजनांचीही माहिती दिली.