स्वातंत्र्यसैनिक, इतिहास संशोधक कै. बा. बा. महाराज यांच्या संग्रहातील ऐतिहासिक ठेवा
अहिल्या परकाळे/ कोल्हापूर
1980 चे वर्ष. कोल्हापुरातील स्वातंत्र्यसैनिक आणि इतिहास संशोधक बाळासाहेब बापूसाहेब उर्फ बा. बा. महाराज यांच्या ऐतिहासिक, दुर्मीळ वस्तुंचे प्रदर्शन सांगलीत भरले होते. स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या प्रदर्शनातील दुर्मीळ वस्तू पाहण्यासाठी सांगलीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. स्वतः वसंतदादा पाटील यांनीही बा. बा. महाराजांचे कौतुक केले. प्रदर्शनाच्या गर्दीत लता देशपांडे नावाच्या एक महिला बा. बा. महाराज यांच्याकडे आल्या त्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास कथन करून आपल्याकडे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची रक्षा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पिस्तुल आणि पिस्तुल पाठविण्यासाठीचे पुस्तक असा ऐतिहासिक वस्तू आहेत. दुर्मीळ ठेवा आपल्या प्रदर्शनात राहिला तर तो पुढील अनेक पिढय़ांना पाहता, अनुभवता येईल, तेंव्हा या ऐतिहासिक वस्तू आपण स्वीकाराल काय? अशी विनंती केली. बा. बा. महाराजांनी ती मान्य केली आणि 1920 मध्ये महानिर्वाण झालेल्या लोकमान्य टिळकांची रक्षा महाराज यांच्या दुर्मीळ वस्तूंच्या खजिन्यात आली. या घटनेला 40 वर्षे लोटली. लोकमान्य टिळकांची रक्षा शाहूनगरी कोल्हापुरात अनमोल ठेवा म्हणून जतन केली गेली. आज लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करत असताना महाराज घराण्याने जतन केलेला ठेवा करवीरकारांबरोबर समस्त देशवासियांना प्रेरणादायी ठरेल, असा आहे.
बा. बा. महाराज हे कोल्हापूरच्या महाराज घराण्यातील. स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेल्या महाराज यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. तेंव्हा बा. बा. महाराजही त्यांच्याबरोबर संस्थापक सदस्य होते. महाराज यांनी इतिहास संशोधन आणि दुर्मीळ वस्तूचा संग्रह करून त्याचे प्रदर्शन भरविण्यास प्रारंभ केला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या देशाताच्या इतिहासाच्या उदरात दडलेल्या अनेक दुर्मीळ वस्तु, दस्ताऐवज त्यांनी संग्रहित केला. संग्रहात आज हजारो दुर्मीळ वस्तूंचा खजिना आहे.
भारतीय असंतोषाचे जनक, स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. तो मी मिळविणारच अशी गर्जना करणाऱया लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व केले. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळक यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची रक्षा त्याकाळी टिळक घराण्याशी संबंधित असलेल्या सांगलीतील देशपांडे घराण्याकडे आली. त्यांनी 1920 ते 1980 अशी साठ वर्षे टिळकांचा रक्षाकलश जपून ठेवला. 1980 नंतर बा. बा. महाराज यांच्या घराण्याकडे रक्षाकलश आला. त्यांनी लोकमान्यांच्या विचार आणि स्वातंत्र्य लढय़ातील प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, यासाठी गेली चाळीस प्राणपणाने जपून ठेवला आहे. देशपांडे यांनी दिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्लंडमधून पुस्तकात लपवून पाठविलेले पुस्तक आणि पिस्तुलही जपून ठेवले आहे. बा. बा. महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजेश महाराज यांन ऐतिहासिक खजाना नव्या पिढीसाठी जपून ठेवला आहे.
विलक्षण योगयोग
लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यात स्नेह आणि तात्विक मतभेद होते. पण दोघांचाही एकमेकाविषयीचा आदर कधीही कमी झाला नाही. लोकमान्य टिळकांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच भोजन घेत असलेल्या शाहू महाराजांनी घास न घेता भरलेले ताट पुढे करून माझा मित्र गेल्याची भावना व्यक्त केली होती. त्याच शाहू महाराजांच्या कोल्हापुरात लोकमान्य टिळकांची रक्षा जतन केली आहे, हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
महात्मा गांधीजींचा अस्थिकलशही संग्रहात
महात्मा गांधीजींची 1948 मध्ये हत्या झाली. त्यांचा अस्थिकलशही महाराज घराण्याने जपून ठेवला आहे.