विमाननगर स्थलांतरित शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांची अपेक्षा, सहकारावर दिल्लीत बैठक घेणार असल्याचीही माहिती
पुणे / प्रतिनिधी
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’ संस्था मागील 26 हून अधिक वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे. लोकहिताच्या दृष्टीकोनातून सोसायटीच्या यशस्वी ‘मॉडेल’चा व्यापक विस्तार व्हायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. सहकारातील प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीत आगामी काळात बैठक घेणार असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
‘लोकमान्य सोसायटी’च्या विमाननगर स्थलांतरित शाखेचे उद्घाटन डॉ. कराड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, पुणे भाजप सरचिटणीस राजेश पांडे, पुणे महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सोसायटीचे संचालक प्रसाद ठाकूर, पंढरी परब, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, ‘लोकमान्य’चे पुणे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक सुशील जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी म्हणून जॉन योहान्नम, महेश करपे, अनिल अहीर, सुधीर मतेती, संजयसिंग, राज बच्चानी यांचा प्रातिनिधीक सत्कार डॉ. कराड यांच्याहस्ते करण्यात आला. तर संचालक प्रसाद ठाकूर यांच्याहस्ते डॉ. कराड, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विद्याधर अनास्कर, राजेश पांडे यांचे स्वागत व सत्कार तसेच प्रशांत वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. कराड म्हणाले, खासगी बँका तळागाळापर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यादृष्टीने पतसंस्थांचे काम महत्त्वपूर्ण असते. कारण, त्यातून सर्वसामान्यांना कर्ज उपलब्ध होते. 1995 ला स्थापन झालेल्या ‘लोकमान्य’ने मागच्या 26 वर्षांत सहकार क्षेत्रात अत्यंत भरीव योगदान दिले आहे. ‘लोकमान्य’च्या या यशस्वी मॉडेलचा व्यापक विस्तार झाला पाहिजे. कोविड काळातही संस्थेने अतिशय चांगले काम केले. यापुढेही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
सहकारातील प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सहकार खात्याची निर्मिती करीत त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविली आहे. सहकारातील प्रश्न समजून घेऊन अजून चांगले काम कसे करता येईल, यासाठी आगामी काळात दिल्लीत बैठक घेऊ. त्यात सहकाराला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देतानाच क्रिप्टोला पर्याय म्हणून देशातील 75 जिल्हय़ांमध्ये 75 डिजिटल बँका काढण्यात येणार आहेत, अशी माहितीही डॉ. कराड यांनी दिली.
‘लोकमान्य’ ही आदर्श संस्था : रणजित निंबाळकर
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, ‘लोकमान्य सोसायटी’ आणि ‘दैनिक तरुण भारत’च्या माध्यमातून किरण ठाकूर यांनी केवळ लोकहिताचा विचार समोर ठेवला. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. महाराष्ट्रासाठीचा त्यांचा त्याग आणि प्रेमाची जाणीव आपण सर्वांनी ठेवायलाच हवी. राष्ट्रीयकृत बँकेएवढी विश्वासार्हता मिळवित मुदत ठेवी जमा करणे, आधुनिक बँकेप्रमाणे वित्तीय सेवा व बहुउद्देशीय सेवा उपलब्ध करून देणारी ही सोसायटी निश्चितच एक आदर्श संस्था आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘लोकमान्य मॉडेल’ देशभर राबविले जावे : अनास्कर
विद्याधर अनास्कर म्हणाले, ठेवींवर सर्वाधिक परतावा देऊनही सोसायटीने यशस्वीपणे आपले मॉडेल राबविले आहे. ‘लोकमान्य’च्या या मॉडेलवर निश्चितपणे संशोधन व्हावे. ते सर्वांपर्यंत पोहोचावे. देशभर राबविले जावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद किरण ठाकूर यांनी केले. ‘लोकमान्य’चा यशस्वी प्रवास मांडतानाच लोककल्याणाचे तत्त्व असलेला सहकार संवर्धित झाला पाहिजे. सहकारातून समाज घडतो. हा केवळ एक व्यवसाय नसून एक चळवळ असल्याचे प्रतिपादन ठाकूर यांनी केले. सुशील जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.