लोकमान्य सोसायटीचे 27 व्या वर्षात पदार्पण
प्रतिनिधी /बेळगाव
केवळ मुठभर श्रीमंत होऊन चालणार नाही तर समाज श्रीमंत व्हायला हवा. त्यासाठीच लोकमान्य सोसायटीने अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या पुढील काळात लोकमान्य सोसायटी शिक्षण क्षेत्रात विविध योजना राबविणार आहे. त्यांच्या पूर्ततेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, अशी अपेक्षा लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केली.
लोकमान्य सोसायटीने यशस्वी 26 वर्षे पूर्ण करुन 27 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त गुरुवारपेठ येथील मुख्यालयात महालक्ष्मी पूजन आणि सदिच्छाभेट सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी किरण ठाकुर बोलत होते. प्रारंभी त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. डी. टी. वागळे, संचालक अजित गरगट्टी, अनिल चौधरी, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, प्रभाकर पाटकर, सेवंतीलाल शहा, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले तसेच दीपक गुरुंग, एम. एन. कुलकर्णी, सी. आर. पाटील, किरण गावडे, विकास केशकामत आदी उपस्थित होते.
किरण ठाकुर म्हणाले, 26 वर्षांपूर्वी लोकमान्य सोसायटीची स्थापना केली. सर्वसामान्यांचे हित हाच दृष्टिकोन सोसायटीने डोळय़ासमोर ठेवला. आज रोजगार, आरोग्य सेवा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात सोसायटी कार्यरत आहे. अलिकडेच एसकेई सोसायटीचे चेअरमन म्हणून आपली निवड झाली आहे. लोकमान्य सोसायटी आणि एसकेई सोसायटी तसेच तरुण भारत ट्रस्टच्या माध्यमातून आता पुढील काळात कौशल्याधारित शिक्षण दिले जाईल.
गुणांच्या चढाओढीत सामान्य विद्यार्थी मागे पडू नये याकडे सोसायटीचा कटाक्ष राहिल. नापासांसाठी शिक्षण मिळण्याची सोय केली जाणार आहे. इतर विद्यापीठांचे सहकार्य घेऊन एसकेईतर्फे समांतर विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकमान्यच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावषी सोसायटीने 10 हजार कोटीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढील काळात लोकमान्य सोसायटीने गरुड झेप घेण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगून निवडणुकीचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, तात्पुरता फायदा बघू नका. आपले मत विकू नका. राष्ट्रीय पक्षांचे स्थानिक प्रश्नांशी फारसे देणे-घेणे नसते. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्यालाच तुम्ही विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी सीईओ अभिजित दीक्षित यांच्या हस्ते किरण ठाकुर यांचा तर एम. एन. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. वागळे यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. उपस्थित मान्यवरांना ज्योती रेगे यांनी पुष्पगुच्छ दिले. ज्योती या सोसायटीच्या पहिल्या कर्मचारी असल्याने त्यांचा तसेच वाढदिवसानिमित्त पुष्कर याळगी, अरुणा गावडे, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमान्य सोसायटीने विकसित केलेल्या आरती संग्रह ऍपचा शुभारंभ करण्यात आला.
एसकेई सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व संचालक मंडळातर्फे किरण ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या सर्व विभागीय कार्यालयातर्फे किरण ठाकुर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे विभागातर्फे सुशील जाधव यांनी किरण ठाकुर यांचे अभिनंदन केले. लोकमान्यला पुण्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. यावेळी सावंतवाडी-आनंद सामंत, रत्नागिरी-विरेंद्र ठाकुर, कोल्हापूर-दिलीप पाटील, सांगली-सुदत्त फाटक, म्हापसा-कुमार प्रियोळकर, मडगाव-सुहास खांडेपारकर, नाशिक-प्रकाश चितोडकर, मुंबई-रमेश शिरसाठ, बेळगाव-एम. एन. कुलकर्णी या विभागीय कार्यालयातून सर्वांनी शुभेच्छा दिल्या व सोसायटींच्या विभागीय कार्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. ज्योती रेगे यांनी आभार मानले.