ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेली लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच आता मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे.
ते म्हणाले, कोरोनाचे निर्बंध शिथील करताना काही बाबतीत आपण अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात लसीकरण बऱ्याच प्रमाणात झाले आहे. तरी देखील तेथील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. आपले राज्य सरकार सर्वसामान्यांच्या जिवाची काळजी घेत आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, रेल्वे प्रवासाबाबत दोन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल ट्रेनमध्येच नव्हे, इतर ठिकाणीही कशा प्रकारे सूट देता येईल यावरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी विरोधीपक्ष भाजपकडून आज मुंबई, ठाण्यात आंदोलने करण्यात आली. या आंदोलनास सर्वसामान्यांचा ही पाठिंबा मिळत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली जात आहे.