सोनिया गांधी यांचे वक्तव्य ः काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेत मंगळवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली असून यात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रत्येक स्तरावर एकता तसेच लवचिकता राखण्यावर भर दिला आहे. पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे उद्देशून सोनियांनी लवकरच अनेक बदल करणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे कार्यकारी समितीची बैठक बोलाविणार असल्याचे नमूद पेले आहे. लोकशाही तसेच समाजाच्या भल्यासाठी काँग्रेसचे पुनरुज्जीवन करावे लागणार असल्याचे उद्गार सोनियांनी या बैठकीला संबोधित करताना काढले आहेत.
अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांमुळे तुम्ही किती निराश आहात हे मी चांगल्याप्रकारे जाणून आहे. हे निकाल चकित करणारे आणि दुःख देणारे आहेत. पक्षाला बळकट करण्यासंबंधी अनेक सूचना मिळाल्या असून त्या समपर्क असल्याचे सोनियांनी जी-23 या असंतुष्ट नेत्यांच्या समुहाला उद्देशून म्हटले आहे.
चिंतन शिबिर
मागील महिन्यात 5 राज्यांच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर चिंतन शिबिर आयोजित करण्याचा निर्णय समोर आला होता. या चिंतन शिबिरात मोठय़ा संख्येत पक्षाच्या नेत्यांचे विचार ऐकले जातील, हेच विचार पक्षाला बळकट करण्यास योगदान देतील. तसेच समोर असलेल्या आव्हानांवर कशाप्रकारे मात करावी याची दिशा देऊ शकतील, असे सोनियांचे मानणे आहे.
पुढील वाटचाल अवघड
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुःखदायक आहे. पंरतु पुढचा मार्ग आणखी कठीण आहे, यामध्ये पक्षासंबंधीची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार असल्याचे सोनियांनी म्हटले आहे. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी देखील उपस्थित होते.
भाजपवर टीकास्त्र
सोनिया गांधींनी बैठकीत भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. सत्तारुढ पक्षाचा फूट पाडण्याचा आणि ध्रूवीकरण करण्याचा अजेंडा आता जणू प्रत्येक राज्यात रुळायला लागला आहे. ही अजेंडय़ाची आग अधिक पेटविण्यासाठी इतिहासाशी छेडछाड केली जातेय. तथ्यांना सोयिस्करपणे वेगळय़ा स्वरुपात समोर आणले जात आहे. या द्वेषपूर्ण शक्तीला रोखायचे आहे असे सोनियांनी म्हटले आहे.