प्रतिनिधी/ सातारा
लोकशाही टिकून राहण्यासाठी राजकारणामध्ये प्रबळ विरोधकांची नितांत गरज आहे. विकासाची दृष्टी असलेले सरकार सक्षमपणे सत्तेवर असायला हवे, त्याच पद्धतीने लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधक देखील तितकेच प्रबळ असायला हवेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापूरहून पुण्याकडे जात असताना प्रतिभाताई पाटील साताऱयात आल्या होत्या. येथील शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी अनौपचारिकपणे त्यांनी गप्पा मारल्या. यावेळी सध्याच्या राजकीय वातावरणावर त्यांनी भाष्य केले. दरम्यान, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिभाताई पाटील यांचे स्वागत केले.
प्रतिभाताई पाटील पुढे म्हणाल्या, विकासाची दृष्टी असलेले सरकार सक्षमपणे सत्तेवर असायला हवे, त्याच पद्धतीने लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधक देखील तितकेच प्रबळ असायला हवेत. पूर्वीपेक्षा महाराष्ट्र खूपच बदलेला आहे. सातारा जिह्याविषयी आपल्याला विशेष प्रेम असून या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, देशभक्त किसन वीर यांच्यासारख्या थोर माणसामुळे ही सातारा भूमी पावन झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले नुकतेच भेटून गेले त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा देखील केली असे ही प्रतिभाताई म्हणाल्या.
कोल्हापूर जिह्यातील बाळूमामांचे आदमापूर या तीर्थक्षेत्रावर प्रत्येक अमावस्येला लाखोंच्या संख्येने बघत येत असतात, त्यामुळे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी केली जावी, अशी तेथील स्थानिक जनतेची मागणी आहे. मी याठिकाणी भेट दिल्यानंतर येथील स्थानिक जनतेने ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱयांना मी याबाबतच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, ऐतिहासिक महत्व असलेला सातारा औद्योगिकदृष्टय़ा देखील पुढे येत असल्याचेही प्रतिभाताईंनी सांगितले.