- डॉ. नितीन करमाळकरांच्या हस्ते आंबेडकर ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन
ऑनलाईन टीम / पुणे :
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघर्षाची कहाणी लेख व ग्रंथसंपदेच्या माध्यमातून पुढे आणली. धर्मशास्त्राच्या आधारे जातीची संरचना केली गेली. माणसातील गुणवत्ता नाही, तर जातीच्या आधारे ठिकठिकाणी त्याला स्थान दिले जाते. त्यामुळे क्षमा, शांती, दया असा गौतम बुद्धांचा विचार असलेल्या बौद्ध धर्मात त्यांनी धर्मांतर केले. कोणताही संघर्ष रक्तरंजित नसावा, लोकशाही व चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून संघर्ष व्हावा. लोकशाही व शिक्षणाच्या माध्यमातून समाजबदल होऊ शकतो, हा विचार घेऊन ते कायम समाजासमोर गेले, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ.करमाळकर यांच्या व्याख्यानाने झाले. लायन्स क्लब इंटरनॅशनल व लायन्स क्लब ऑफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होत आहेत.
डॉ.नितीन करमाळकर म्हणाले, भारतीय समाजाच्या प्रत्येक समाजघटकाचा विचार त्यांनी भारतीय घटनेत केला. लोकशाही घट्ट होण्याच्या दृष्टीने जे काही आवश्यक असेल, ते त्यांनी आणले. एक देश, एक भाषा, एक न्यायव्यवस्था असायला हवी, हा त्यांचा विचार होता. राज्यांच्या निर्मीतीपासून समाजाला पुढे आणण्याच्या दृष्टीने विचार केला गेला. भारतातील प्रश्नांची त्यांना जाण होती. शेतीला उद्योग-धद्यांच्या माध्यमातून अन्य रोजगाराचे पर्याय दिले पाहिजेत, असा विचार करणारे डॉ.आंबेडकर हे मोठे व्यक्तिमत्व होते, असेही त्यांनी सांगितले.
इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व्हावा, याउद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.