किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : 70 व्या वाढदिवसानिमित्त ‘तरुण भारत’ परिवारातर्फे स्नेहमेळा
प्रतिनिधी / बेळगाव
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून अन्यायाविरुद्ध झुंज देत ‘तरुण भारत’ने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. ‘तरुण भारत’ने केवळ बातम्या दिल्या नाहीत तर लोकशिक्षण देण्याचा प्रयत्न आजतागायत केला आहे. निर्भिड व स्वतंत्रपणे ‘तरुण भारत’ काम करत आहे. यामुळेच आज प्रत्येकाला आपल्या घरातील पेपर अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे, असे विचार ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मांडले.
किरण ठाकुर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त ‘तरुण भारत’ परिवारातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. हिंडलगा येथील गणाधीश लॉन येथे हा स्नेहमेळावा पार पडला. ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्य या स्नेहमेळाव्याला उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत 70 व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. तत्पूर्वी संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी उपस्थित होते.
किरण ठाकुर म्हणाले, ‘तरुण भारत’मुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. हजारो लोकांचा यामधून विकास झाला. त्यामुळेच आजही ‘तरुण भारत’वरचा विश्वास अढळ आहे. येणारा प्रत्येक दिवस हा आनंदात व समाजाप्रती घालवायचा आहे. आजवर अनेक संकटे आली, परंतु या प्रत्येक संकटात ‘तरुण भारत’ परिवार व लोकमान्य परिवारातील सदस्यांची एकजूट अभेद्य राहिली. त्यामुळे या सर्वांचा मला अभिमान असून हीच एकजूट यापुढेही ठेवावी, असे त्यांनी नमूद
केले.
यानंतर संतोष गुरव यांच्या हार्मनी ऑर्केस्ट्रातर्फे सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गायकांनी हिंदी, मराठी गीतांचा नजराणा पेश केला व वाहव्वा मिळविली.
या कार्यक्रमाला बाबा धोंड, महाराष्ट्राचे माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, भाजप नेते किरण जाधव, काँग्रेसचे नेते मलगौडा पाटील, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, आर्किटेक्ट उमेश सरनोबत, वृत्तपत्र विपेते संघटनेचे अध्यक्ष प्रताप भोसले, माजी अध्यक्ष सुभाष गोरे, आनंद गर्डे, संजय घोरपडे, राजा भोसले, ज्ये÷ एजंट मधुकर देशपांडे, विशाल देशपांडे, अनंत लाड, वैजनाथ पाटील, राजेश वाळवेकर, लुईस रॉड्रिग्ज यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तरुण भारत परिवारातील प्रत्येक विभागातील सदस्याने किरण ठाकुर यांना शुभेच्छा दिल्या.
किरण ठाकुर सर्वच क्षेत्रात अग्रेसर
संपादक जयवंत मंत्री म्हणाले, श्रीमंती ही माणसाच्या संपत्तीवर नाही तर त्या माणसामध्ये असणाऱया कलागुणांवर अवलंबून असते. किरण ठाकुर हे असे व्यक्तिमत्त्व आहे, की जे कला, साहित्य, नाटय़ अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांचा खंबीरपणा, नेतृत्व गुण यामुळेच त्यांनी अनेकवेळा संकटांचा सामना केला आहे. त्यांनी केलेल्या आजवरच्या पारदर्शी व्यवहारांमुळे लोकमान्यचा विस्तार आज देशभर पसरला आहे. किरण ठाकुर यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृत्तपत्र व्यवसाय विस्तारला असल्याचे सांगून संकटकाळात किरण ठाकुर यांनी जे धैर्य आणि संयम दाखविला, त्याला तोड नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
– संपादक जयवंत मंत्री
किरण ठाकुर यांनी आपल्या सैन्याला धीर दिला
‘तरुण भारत’चे सीएफओ वीरसिंग भोसले यांनी सैन्याचे मनोबल वाढविण्याचे काम सेनापती करत असतो. किरण ठाकुर यांनी अनेक संकटांना तोंड देत आपल्यासोबत असणाऱया सैन्याला धीर दिला. यामुळेच आज लोकमान्य, तरुण भारत यासह इतर संस्था झपाटय़ाने प्रगती करत असल्याचे सांगून किरण ठाकुर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-वीरसिंग भोसले