वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
जागतिक पातळीवर तुलना करता भारतात प्रतिलाख रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक लाख लोकसंख्येमागे 114.67 रुग्ण आहेत. तर भारतात ही संख्या केवळ 30.4 इतकी आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने 21 जूनच्या अहवालात दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. दरम्यान, देशभरात मागील चोवीस तासात 14 हजार 821 नवे रुग्ण आढळले. तर 9 हजार 440 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 55.77 इतकी झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात नवे 14 हजार 821 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे. यातील 1 लाख 74 हजार 387 जणांवर उपचार सुरू आहेत. 2 लाख 37 हजार 196 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 13 हजार 699 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 445 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक 186 बळी हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे 63 व 53 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, देशातील चाचणींची संख्याही वाढली आहे. आता दररोज सुमारे दोन लाख चाचण्या होत आहेत. रविवारी 1 लाख 90 हजार 730 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीमध्ये आता दरारोज 18 हजार चाचण्या
दिल्लीमध्ये यापूर्वी दररोज पाच हजार चाचण्या होत होत्या. आता ही संख्या 18 हजारांवर गेली आहे. आता सर्वसामान्यांना चाचण्यासाठी अडचणीला सामोर जावे लागत नाही, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. दरम्यान, कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कामाख्या मंदिर तीन दिवसांसाठी बंद
आसाममधील गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या मंदिर तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊननंतर 75 दिवसानंतर 8 जून रोजी मंदिर उघडले होते. अंबुवाची उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र प्रथेप्रमाणे तीन दिवस पूजाअर्चा होणार आहेत. मागील वर्षी अंबुवा उत्सवामध्ये सुमारे 25 लाख भाविक सहभागी झाले होते.