प्रतिनिधी/ फोंडा
संपुर्ण गोवा राज्यातील कलाकारांच्या सन्मानार्थ येत्या काळात 2 लाख चौ. मीटरच्या विर्स्तीण परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पग्राम उभारण्याची प्रक्रिया कला व संस्कृती खात्याअंतर्गत अंमलात येणार असल्याची घोषणा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली. पुर्वजांची संस्कृती आजही टिकवून ठेवण्यास ‘मांड संस्कृती’चा महत्चाचा वाटा आहे. भिन्न भाषा, भिन्न प्रांता आडही एकजूटीचे नाते केवळ मांड संस्कृतीमुळे टिकून राहिल्याचे प्रतिपादन गावडे यांनी यावेळी केले.
फोंडा येथील राजीव कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात शांतादुर्गा सांस्कृतिक मंडळातर्फे एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत राजीव कला मंदिरच्या सहकार्याने काल शनिवार सायंकाळी आयोजित केलेल्या कलातरंग महोत्सवात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, प्रमुख वक्ते म्हणून लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. कमलाकर म्हाळशी, समाजसेवक निलेश शिरोडकर, समील वळवईकर, वास्को नगरपालीकेचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे, कुभांरजुवे पंचसदस्य प्रशांत भंडारी, उद्योजक बाबू रायकर, शांतादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शक महेद्र गावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रवी नाईक यांनी गोव्याच्या कलाकारांनी जगभरात गोमंत भूमीने नाव पोचविलेल्याचे सांगितले. गोव्याची संस्कृती योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे झटत असल्याचे त्यानी यावेळी नमूद केले.
मंत्री गोविंद गावडे पुढे बोलताना म्हणाले लोकसंस्कृतीची पताका शांतादुर्गा मंडळाचे मार्गदर्शक महेद्र गावकर यांनी जगभरात पोचविण्याचे सदोदीत प्रयत्न करीत असून हीच कुंभारजुवेवासियांसाठी ही मानाची बाब असल्याचे कौतुगोद्गार त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांनी लोकसंस्कृतीसाठी अभ्यासू वृत्ती जोपासावी-प्रा. म्हाळशी
प्रा. कमलाकर म्हाळशी यांनी राज्यातील कलाकारांसाठी एक उत्तम दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री गोविंद गावडे यांना केले. आपण समीक्षक या नजरेतून परीक्षण करताना गोव्यातील लोककलाकारांनी चेहऱयांचा हावभावार लक्ष देणे, शारिरीक कवायती तोल सांभाळून करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रमाअंतर्गत लोकसंस्कृती विषयावर प्रकल्प सादर करताना अभ्यासू वृत्ती जोपासण्याचा सल्ला प्रा. म्हाळशी यांनी दिला.
अंत्रुज महालातील बुजुर्ग लोककलाकारांच्या स्मरणार्थ संस्थेतर्फे लोकतरंगचे खास आयोजन राजीव कला मंदिरमध्ये केल्याचे महेंद्र गावकर यांनी सांगितले. लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठी राजाश्रय व लोकाश्रय अंत्यआवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
महोत्सवाचे उद्घाटन मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर संस्थेतर्फे वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली. सोहळय़ाचे अध्यक्षस्थान बाबू रायकर यांनी भूषविले. स्वागत व प्रास्ताविक महेद्र गावकर यांनी केले. प्रविणा सावंत यांनी आभार मानले.