संसदेत पुन्हा गदारोळ, कामकाजात व्यत्यय, घोषणाबाजीमुळे गोंधळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सभागृहात असहय़ घोषणाबाजी करुन आणि गोंधळ निर्माण करुन कामकाज चालविणे अशक्य केल्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांची कानउघाडणी केली आहे. आपण जे करीत आहात ते समर्थनीय आणि शोभनीय नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकसभेत बुधवारी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱया दिवशी प्रश्नोत्तर तासातही विरोधकांनी गोंधळ घातला. काही विरोधी खासदार सभाध्यक्षांच्या आसनानजीक येऊन घोषणा देऊ लागल्याने अध्यक्ष संतप्त झाले होते. विनंती करुनही ते जागांवर गेले नाहीत. त्यामुळे अध्यक्षांना इशारा द्यावा लागला.
फलकांवर आक्षेप
काही विरोधी सदस्य सभागृहात घोषणांचे फलक घेऊन आल्याने अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. आपली वर्तणूक योग्य नाही. ज्येष्ठ सदस्य बोलत असताना तुम्ही गोंधळ घालत आहात. तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्याची पुरेशी संधी मंगळवारी देण्यात आली होती. आता गोंधळ चालू देणार नाही, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
कामकाजात व्यत्यय
विरोधी सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्याने लोकसभेचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले. अखेर दुपारनंतर ते दिवसभरासाठी स्थगित केले गेले. अशा प्रकारे तिसरा दिवसही गोंधळातच गेला.
राज्यसभेत तेच चित्र
राज्यसभेत प्रश्नोत्तरांचा तास शांततेत पार पडला. मात्र नंतर गोंधळाला प्रारंभ झाला. 12 खासदारांच्या निलंबनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला. तथापि, सभाध्यक्षांनी त्याला दाद दिली नाही. विरोधी पक्षांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विविध मुद्दे उपस्थित केले होते. त्यांच्यात पेगॅसस हा महत्वाचा मुद्दा होता. तथापि, गेल्या तीन दिवसांमध्ये हा मुद्दा लक्षणीयरित्या उपस्थित करण्यात आलेला नाही. सरकारने सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.