ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशाजनक दावा केला आहे. गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही असं म्हंटलं आहे.
माजी खासदार आझाद यांनी देशातील ‘सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागाही जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,’ असे ते म्हणाले. आझाद बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे एका सभेला संबोधित करताना आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला.
दरम्यान, देशात सुरु असलेली काँग्रेसची पडझड अद्याप थांबलेली नाही. अनेक राजकीय नेते आजही काँग्रेस सोडून इतर पक्षात जात आहेत. काहींनी तर काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत हे वारंवार समोर आलं आहे. अलीकडेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेचे नेते अमरिंदर सिंग यांनी पक्षाला रामराम करत नवीन पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची होणारी पडझड थांबली नाहीतर काँग्रेस निवडणुकीत कितपत यश संपादन करेल हे पाहावे लागणार आहे.