राहुल यांच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा : सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा काँग्रेसचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत शुक्रवारचा दिवस गोंधळातच वाया गेला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाडसंबंधी एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पंतप्रधानांना दंडुक्याने मारहाण करण्याशी संबंधित विधानाप्रकरणी राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागावी, असे म्हटले. हर्षवर्धन यांच्या मागणीनंतर काँग्रेस खासदारांनी त्यांच्या दिशेने धाव घेतल्यावर भाजप खासदार तेथे पोहोचले. वाद चिघळत असल्याचे पाहून अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केल्याने अनर्थ टळला.
काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहून गैरवर्तन करणाऱया खासदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. तर टागोर हेच हर्षवर्धन यांच्या अंगावर धावून गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याप्रकरणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या दालनात बैठक झाली असून हर्षवर्धन यात उपस्थित होते. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही लोकसभा अध्यक्षांशी याप्रकरणी चर्चा केली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांविषयी केलेल्या विधानाची हर्षवर्धन हे निंदा करत असताना काँग्रेस खासदार टागोर हे त्यांच्या अंगावर धावून गेले असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी म्हटले आहे. तर सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचे म्हणत राहुल यांनी काँग्रेस खासदारांनी हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे. वायनाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नसल्याचा मुद्दा उपस्थित करू इच्छित होतो. माझे बोलणे रोखण्यासाठीच भाजपने सभागृहात हे नाटय़ घडविले आहे. काँग्रेस खासदाराने हल्ला केलेला नाही उलटपक्षी त्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
राहुल यांचे वादग्रस्त विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील सहा महिन्यांमध्ये स्वतःच्या घरामधूनच बाहेर पडू शकणार नाहीत. भारताची तरुणाई नरेंद्र मोदींना दंडुक्याने मारणार असल्याचे वादग्रस्त विधान राहुल यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेतील स्वतःच्या भाषणात राहुल यांच्या या विधानाची चांगलीच खिल्ली उडविली होती.