प्रतिनिधी/ मोरजी
हरणे अन जिंकणे हा राजकारणाचा स्थायिभाव आहे. आपण निवडणूक ही एक हरलो तरी या पूर्वी चारदा जिंकलो आहे. यापुढे लोकात राहूनच कार्यरत राहून लोकांची मने पुन्हा जिंकेन, अशी प्रतिक्रिया मांदे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी व्यक्त केली.
मांदे मतदारसंघात या निवडणुकीत पराभवाला समोरे गेल्यानंतर सोपटे पत्रकारांशी संवात साधला. ते म्हणाले, मागील पाच वर्षांत गोव्यात भाजपचे सरकार स्थिर राहावे, यासाठी आपण काही अंशी त्याग केला त्याचे फळ या निवडणुकीत मला निश्चित मिळणार होते. मात्र काही कारणास्तव मला अल्प मतानी पराभवाला सामोरे जावे लागले याची खंत आहेच; मात्र ही खंत आपण करीत बसणार नाही. माझे समाज कार्य आणि राजकारण यापुढेही चालू राहील. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन जरूर करेन. यापूर्वी पक्षासाठी त्याग केला. यापुढेही पक्षासाठी प्रामाणिक कार्य करेन. पक्षाचे सरकार असल्याने मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूत पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करण्याचा करणार.
निवडणुकीत आपल्या सोबत राहून साथ दिलेल्या मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. अडीअडचणींच्या वेळी सर्वांना आपल्या घराचे दार पूर्वीप्रमाणेच नेहमीच खुले आहे. आपण 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.