भाजपला काँग्रेसचे प्रतिउत्तर
प्रतिनिधी / मडगाव
आज संपूर्ण गोवा कोरोना संकटात सापडला आहे. मागील दोन महिन्यात लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गोमंतकीयांना आज आर्थिक मदतीची गरज असून मोदींच्या जुमला पत्राने त्यांचे पोट भरणार नाही. भाजप सरकार दीवाळखोरीत गेल्याचे सर्वांनाच माहित असून सरकारातील मंत्री, आमदार व भाजप पदाधिकाऱयांनी अनेक घोटाळे करुन जमविलेल्या संपत्तीतील काही वाटा आता जनतेल्या द्यावा अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी केली आहे.
काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयातून व्हिडीयोद्वारे त्यांनी पत्रकारांना संबोधन केले. यावेळी त्यांच्या समवेत दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस तसेच मडगाव गट काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक हजर होते.
प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मोदी सरकारच्या दुसऱया कारकिर्दीतील वर्षपूर्ती निमित्त काल पत्रकार परिषद घेऊन भाजपचे कार्यकर्ते दोन लाख घरात मोदींचे पत्र वितरित करणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे. सामान्य गोवेकरांना आर्थिक संकटात लोटलेल्या भाजप सरकारने उत्सव साजरे न करता, लोकांना संवेदना दाखवून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
भाजपने काल जाहीर केलेल्या डिजिटल संपर्क अभियानाची खिल्ली उडविताना, सुभाष फळदेसाई यांनी काँग्रेस पक्षाने आठ दिवसांमागे घेतलेल्या ‘स्पीक इंडिया’ मोहिमेत गोव्यात इंटरनेट नेटवर्क सेवेचा बोजवारा उडाल्याचे उघडकीस आणले होते. त्यामुळे डिजिटल अभियाना ऐवजी गोव्यातील नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी सुभाष फळदेसाई यांनी केली आहे.
भाजपचे केंद्र सरकार व राज्य सरकार आज दीवाळखोर झाले असून, देशाला व राज्याला त्यांनी आर्थिक संकटात लोटले आहे. गोवा सरकारने मागीतलेले दोन हजार कोटींचे पॅकेज सोडाच, राज्याचा अधिकाराचा जीएसटीचा वाट देण्यासही केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांनी सुरवातीपासुन सामाजिक कोविड चाचणी हाती घेण्याची सातत्याने मागणी केली होती. आज त्यांचे म्हणणे ऐकले असते तर मांगोर हिलची वेळ आली नसती असे ज्यो डायस म्हणाले.