चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
देशात फेब्रुवारीमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णापासून सुरु झालेली कोरोनाची कहाणी आता उग्र रुप धारण करु लागलीय. देशभरात रुग्णसंख्या वाढत असताना फक्त महाराष्ट्र राज्यात ती भयावह होवू लागलीय. मुंबई व पुण्यातून महाराष्ट्रातील खेडोपाडय़ात गेलेले नागरिक बाधित म्हणून समोर येवू लागल्याने गेल्या दोन तीन दिवसात होत असलेली वाढ अंगावर काटा आणू लागलीय. तर सातारा जिल्हय़ात शनिवारी रात्री उशिरापर्यंत एका दिवसात वाढलेली 77 रुग्णांची संख्या आता काळजात धडकी भरवू लागल्याने जिल्हय़ातील नागरिकांना आता कडक लॉकडाऊन हवाय. नागरिकांमध्ये तशी चर्चा सुरु आहे. मात्र एकीकडे प्रशासनाने दिलेली शिथीलता व दुसरीकडे कोरोना बाधितांची वाढू लागलेली संख्या यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी एकत्रित येवून यावर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झालीय.
सातारा जिल्हय़ात मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून लॉकडाऊन करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुरु केली. तेव्हा जिल्हय़ात एक देखील कोराना बाधित रुग्ण नव्हता. मात्र शासनाकडून आलेल्या सुचनांनुसार जिल्हय़ात कार्यवाही सुरु झाली होती. गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली होती. सार्वजनिक वाहन व्यवस्थाही बंद झाली होती तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या तर मंडईसारखी गर्दी होणारी अत्यावश्यक ठिकाणे देखील बंद झाली होती. त्यावेळी जिल्हय़ात फक्त दोन बाधित रुग्ण होते. हळूहळू बाधितांची संख्या वाढू लागली मात्र ती एवढी नव्हती तरीही कडक लॉकडाऊन पाळण्याकडे प्रशासनाचा कल होता.
एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्याकडे जाताना कराडमध्ये बाधितांची संख्या वाढत गेली तर जिल्हय़ातील इतर तालुक्यात गंभीर स्थिती नव्हती. काही तालुके तर पहिल्यापासून ग्रीन झोनमध्ये होते. खंडाळय़ातील पहिली बाधित महिला रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेली तर सातारा तालुक्यातील एक परदेश प्रवास करुन आलेल्या बाधिताचे दुर्दैवाने निधन झाले होते. मात्र कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता तर सातारकर लॉकडाऊनला कंटाळले होते. या कालावधीत आरोग्य विभाग आणि पोलीस दलाला प्रचंड काम करावे लागले आणि नागरिकांनी रस्त्यावर फिरुच नये यासाठी प्रसंगी रोष अंगावर ओढून घेत पोलिसांनी रात्रंदिवस कोरोना वॉरियर्सची डय़ुटी बजावली.
सातारा जिल्हय़ात एकीकडे मोठय़ा प्रमाणावर कोरोना बाधित आढळून येत असून त्यातील बहुतांशी मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून आलेले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने लॉकडाऊन शिथील केल्याने मग पोलिसांनी काठय़ा घरीच ठेवल्या असून रस्त्याने गर्दी नागरिकांना ते जरादेखील हटकत नाहीत. पोलिसांनी आता बघ्याची भूमिका घेतली आहे.
कराड पाठोपाठ आता सर्वच तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्याही वाढत असल्याने नागरिकांमधील गांभीर्य दूर झाले होते. अत्यावश्यक सेवांसह बाजारपेठेतील काही दुकाने सुरु झाल्याने गर्दी वाढू लागली होती तर शासनाच्या नवीन नियमांप्रमाणे कंटेन्मेंट झोन मायक्रो करण्यात आल्याचा नागरिक गैरफायदा घेवू लागल्याचे विदारक चित्र जिल्हाभरात सर्वजण अनुभवत आहेत.