नियुक्ती, कोरोना संकटामुळे रखडले काम
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील लोकायुक्तांकडे 75 प्रकरणे प्रलंबित असून काही कारणांमुळे नवीन प्रकरणांची नोंदही झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले न्या. अंबादास जोशी यांनी सदर प्रकरणांची सुनावणी चालू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मागील एप्रिल महिन्यात न्या. जोशी यांची नेमणूक राज्य सरकारने केली होती. त्यानंतर अद्याप एकाही प्रकरणाचा निकाल लावण्यात आलेला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे सुनावणी होऊ शकली नाही तथापि आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने सुनावणी चालू करण्यात आली असून समोर असलेल्या 75 प्रकरणांचा छडा लावणे हे एक आव्हानात्मक काम लोकायुक्तांसमोर उभे ठाकले आहे.
कोरोना संकटामुळे फाईल्स तुंबल्या
यापूर्वी असलेले लोकायुक्त पी. के. मिश्रा यांची कारकीर्द सप्टेंबर 2020 मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर 7 ते 8 महिने सरकारला नवे लोकायुक्त सापडले नाहीत. त्या कलावधीत अनेक प्रकरणे लोकायुक्तांकडे आली परंतु लोकायुक्त पद रिकामे असल्याने तक्रारी घेण्यात येऊन फक्त फाईलबंद करण्यात आली. त्याची नोंदणी केली की नाही याचाही पत्ता लागेना. अगोदरची प्रकरणे तशीच राहिली व वरील काळात लोकायुक्तांचे एकंदरीत काम ठप्पच झाले होते. कोरोनाचे संकट असल्यामुळे त्याचा फारसा गवगवा झाला नाही. आता कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे पाहून नवीन लोकायुक्तांनी त्याची दखल घेवून कामास सुरूवात केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बापे यांनी दिला लोकायुक्तपदास नकार
अनेक महिने लोकायुक्त नसल्याने विरोधी पक्षांनी आवाज उठवला. प्रकरण न्यायालयात गेले व न्यायालयाने लोकायुक्त नेमण्याचे निर्देश दिले तेव्हा सरकारला जाग आली आणि न्या. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी यु. व्ही. बाक्रे यांनी ते पद स्विकारण्यास नाकार दर्शवला होता. लोकायुक्त सुदर्शन रेड्डी यांनी ताबा घेतल्यानंतर काही महिन्यातच लोकायुक्त पदाचा राजीनामा दिला होता. आता नवीन लोकायुक्त काम करतात यावरच त्या प्रलंबित प्रकरणांचे भवितव्य अवलंबून आहे.