प्रतिनिधी/ चिपळूण
तिवरे धरणफुटीतील बाधितांचे पुनर्वसन अलोरे येथे करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांच्याहस्ते झालेल्या लोकार्पणात घरांच्या चाव्या देण्यात आल्या. मात्र घरांची कामे अर्धवट असल्याने थोडय़ावेळाने त्या चाव्या परत घेण्यात आल्या. लोकार्पणानंतर सोमवारी 4 दिवसांनंतरही बाधित दहाही कुटुंबे तिवरेतील कंटेनर केबिनमध्येच वास्तव्याला आहेत.
तिवरेतील बाधित 56 कुटुंबासाठी मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने केलेल्या आर्थिक सहकार्यातून अलोरे येथे पाटबंधारेच्या जागेवर सिध्दीविनायक नगर वसवण्यात आले. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर यांच्यासह दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पणानंतर दोन बाधितांनी घरांच्या गळतीबाबत ओरड केली आणि दुसऱयाच दिवशी सारवासारव करत कोणतीच तक्रार नसल्याचा पवित्रा घेतला. मुळातच घरांच्या दिलेल्या चाव्या कार्यक्रमानंतर परत घेण्यात आल्या. घरांची कामे अर्धवट असताना करण्यात आलेले लोकार्पण नेमके कुणासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मुळातच सप्टेंबरपर्यत घरांची कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांना मुदत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत 2 जुलैला कार्यक्रम होणार असल्याने कामे वेगाने करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींकडून केल्या गेल्या. दिवस-रात्र काम करूनही काही किरकोळ अंतर्गत कामे शिल्लक राहिलीच. त्यामुळे सध्या घरांचे लोकार्पण होऊनही बाधित दहाही कुटुंबाना दोन वर्षापासून रहात असलेल्या कंटेनर केबिनमध्येच रहावे लागले आहे. शिल्लक कामे वेगाने सुरू आहेत. आठवडाभरात ती पूर्ण होऊन बाधितांना चाव्या दिल्या जातील, असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.