दरड कोसळताच तातडीने रेल्वेचा लावला ब्रेक
प्रतिनिधी /बेळगाव
दूधसागरनजीक शुक्रवारी पहाटे 6 च्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळलेली लक्षात येताच रेल्वेच्या लोको पायलट तसेच इतर कर्मचाऱयांनी प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावला. यामुळे मोठा अनर्थ टळला असून जीवितहानीही टळली आहे. लोको पायलटच्या या प्रसंगावधानाबद्दल नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक गजानन मल्या यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले आहे.
मंगळूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या रेल्वेवर शुक्रवारी पहाटे दरड कोसळली. या रेल्वेचे चालक म्हणून रणजितकुमार हे काम पहात होते. त्यांनी रेल्वेसमोर दगड व माती आल्याचे दिसताच ब्रेक लावला. त्याचसोबत गार्ड शैलेंद्रकुमार यांनी हॅण्डब्रेक लावला. तोपर्यंत इंजिन रेल्वे ट्रक सोडून मातीमध्ये घुसले यामुळे मागील काही डबे चिखलामध्ये ट्रक सोडून बाजुला सरकले. त्यांनी तात्काळ याची माहिती दूधसागर स्टेशन मास्तरना देऊन हुबळी येथून मदत मागविली.
रेल्वेचे इंजिन ट्रक सोडून बाजुला गेल्याने डबेही घसरले होते. तसेच काही डब्यांमध्ये डोंगरावरून घसरून येणारी माती शिरली. त्यामुळे या डब्यातील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये तात्काळ हलविण्यात आले. एकूण 345 प्रवाशांना कुलेम रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. लोको पायलट एस. डी. मीना, साहाय्यक लोको पायलट एस. के. सैनी यांनी रेल्वेच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली. रणजितकुमार व त्यांचे साहाय्यक हर्षद के. यांनी इंजीन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत केली.