मुंबई\ ऑनलाईन टीम
लॉक, अनलॉक यावरून निर्माण झालेल्या गोंधळवरून राजकीय आरोप- प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील या स्थितीवरून निशाणा साधत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यामुळं लोकांना त्रास जास्त होणार आहे तसेच लोक ऑफिसला कसे जाणार, असा सवाल संजय निरुपम यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
संजय निरुपम यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यामुळं लोकांना त्रास जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूक नाहीच. एकतर बसेची संख्या वाढवा किंवा काही प्रमाणात लोकल सुरु करण्यात यावी. लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसला एक मर्यादा आहे, अस त्यांनी म्हटले आहे.
ब्रेक द चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष व पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा गोंधळ निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची रविवारी एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.