नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्य़ाने वाढत आहे. आशावेळी रूग्णांन बेड मिळत नाहीत काही ठिकाणी लसीचा तुटवडा आहे, आशा अनेक प्रश्नांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. यावरूनच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रियांका गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का भासत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही. तुमच्याकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही तुम्ही दुर्लक्ष केलं. आज देशात फक्त २००० ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करु शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे गरज आहे तिथे वेळेत पोहचत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही? कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रुग्णलयांत सुविधा का वाढवली नाही. हे सरकारचं एकप्रकारे अपयश आहे. आजदेखील ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, तुम्ही हसू कसं शकता. इतकी गर्दी एकत्र येत असताना निवडणूक रॅलींमध्ये जाऊन कोणी चाचणी करतंय का ? , असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी यावेळी विचारला.