जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी उपोषण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या 30 वर्षापासून लोटे परशुराम औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदीमार्फत जगबुडी व वाशिष्टी खाडीमध्ये सोडले जात आहे. त्या बाबत वेळोवेळी लेखी तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनस्तरावरून साधी दखलही घेतली जात नसल्याने दर्यासारंग मच्छीमार भोईसमाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी उपोषण करण्यात आले.
या प्रदुषणामुळे टप्प्याटप्प्याने स्थानिक भोई बांधवांचा मच्छी व्यवसाय कायमचा नष्ट झाला आहे. याबद्दल नुकसान भरपाईही मिळालेली नाही. यामुळे हताश झालेल्या समाजबांधवातर्फे रत्नागिरीत एक दिवसाचे लक्ष्यवेधी उपोषण करण्यात आले. या प्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव विजय जाधव, विकास जाधव, सुजित जाधव, कल्पेश करजवकर, उमेश जाधव, योगेश मिशाल, संतोष लवंडे, प्रकाश जाधव, अंकुश जुवळे उपस्थित होते. मंडळाच्यावतीने ठेवण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये गेल्या 30 वर्षांची नुकसान भरपाई, स्थानिक पीडित भोई समाजातील प्रत्येक घरात एका व्यक्तीला कंपनीच्या पे रोलवर कायमस्वरुपी नोकरी, कंत्राटी स्थानिक भोईबांधवांना कायमस्वरुपी नोकरी, पीडित भोईबांधवांना नुकसान म्हणून प्रती महिना 40 हजार रुपये प्रति कुटुंब द्यावेत. प्रदुषणामुळे होणाऱया शेती, पाण्याच्या नुकसानीची भरपाई आदींचा समावेश आहे.
लोटे परशुराम औद्योगिक कारखान्याचे पाणी अरबी समुद्रात सोडण्याची व्यवस्था करावी, लोटे औद्योगिक वसाहतीच्या रुग्णालयात भोई समाजबांधवांवर मोफत उपचार व्हावेत, रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, दर्यासारंग संस्थेतील स्थानिक भोईबांधवांसाठी होडय़ा व जाळी मिळावी, मुलांसाठी शैक्षणिक मदत उपलब्ध करुन द्यावी, प्रत्येक गावामध्ये फिरत्या दवाखान्याची सोय करावी, भोई समाजातील प्रत्येक वस्तीत पिण्याच्या पाण्याची व बोअरवेलची व्यवस्था करावी, भोईसमाजातील वस्त्यांमध्ये रस्ता डांबरी करुन मिळावा, परिसरातील मच्छीमारी करणाऱया भोई समाजाला दत्तक घेणे, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.