प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 15 दिवसातच परवानगी
प्रतिनिधी/ चिपळूण
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात टँकरमधून घातक रसायन ओतल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज व वनविड या दोन कंपन्यांवरील उत्पादन बंदी उठवण्यात आली आहे. 15 दिवसांच्या आतच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या दोन्ही कारखान्यांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र हरिश्री आणि श्रेयस या कारखान्यांवरील उत्पादन बंदी कायम ठेवण्यात आली असून पुढील आठवडय़ात त्यांची सुनावणी होणार आहे.
गेल्या महिन्यात महामार्गावरील असगणी-लवेलनजीक घातक रसायन ओतण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर या विरोधात ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी करूनही प्रकार थांबत नव्हते. अखेर ग्रामस्थांनीच जागता पहारा ठेवत आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे 2 टँकर पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोन्ही टँकर योजना इंडस्ट्रीज व वनविड कंपनीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याबाबतचा प्रस्ताव चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱयांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. मात्र तरीही दोन्ही कंपन्यांचे उत्पादन सुरू असल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत उत्पादन बंद करण्याची ‘डेडलाईन’ दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांवर कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी योजना व वनविड या दोन्ही कारखान्यांना उत्पादन सुरू करण्यास कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली. मात्र ती देताना काही अटीही घातल्या आहेत.यापूर्वी या कंपन्यांचे रसायन आंध्रप्रदेशमध्ये बायप्रॉडक्टसाठी नेण्याचा परवाना दिला आहे. मात्र तेथे रसायन नेताना ते वाटेतच सोडले जात असे. त्यामुळे दिलेला परवाना बदलून यापुढे तळोजा येथे रसायनाची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले. तसेच बँक गॅरंटीची रक्कम जप्त करून नव्याने दुप्पट बॅक गॅरंटी जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पर्यावरण हानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उत्पादन बंदी आदेश असलेल्या श्रेयस व हरिश्री या दोन कंपन्यांवरील कारवाई मात्र कायम ठेवण्यात आली आहे. लासा सुपरजनरिक या कंपनीलाही प्रस्तावित आदेश देण्यात आले असून 15 दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांची पुढील आठवडय़ात सुनावणी होणार असून त्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होणार आहे.