प्रतिनिधी/ पणजी
कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी इतरांच्या मतदारसंघात नाक खुपसण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करण्यावर भर द्यावा, असा सल्ला साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी दिला आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे कळंगूट मतदारसंघ विकासकामात पिछाडीवर गेला आहे, त्यामुळेच लोकायुक्तांनी मंत्री म्हणून लोबो यांना ’अनफिट’ ठरविले होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पणजीत गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपणाला भाजपात जाण्यात रस नाही. भाजपात विद्यमान मंत्र्यांचीच कामे होत नाहीत, अशा पक्षात जाऊन आपण काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फॉरवर्डमध्ये आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.
लोबो कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत
या उलट आपल्याच सरकारने घेतलेल्या निर्णयांना विरोध करणारे लोबो भाजपात संतुष्ट नाहीत हे त्यांची वेळोवेळची कृत्ये आणि वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. गत निवडणुकीत याच लोबो यांनी काँग्रेस उमेदवारांना फूस देऊन भाजपच्या पाच ते सहा आमदारांचा पाडाव करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तेच लोबो आता मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहात आहेत. मात्र भाजपात राहिल्यास ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांनी फॉरवर्डमध्ये यावे, त्यांचे सर्वप्रथम स्वागत आपण करणार असल्याचेही साळगावकर म्हणाले.
लोबो आजही काँग्रेसच्या संपर्कात आहेत याचे पुरावे आपण देऊ शकतो, नपेक्षा आपण भाजपच्या संपर्कात असल्याचा एक तरी पुरावा त्यांनी जाहीर करावा, असे जाहीर आव्हान साळगांवकर यांनी दिले.
एरव्ही आम्ही विधानसभा अधिवेशनात प्रश्न, समस्या मांडत होतो. भाजप सरकारने अधिवेशनाचा कार्यकाळच घटविला. ते अधिवेशने होऊच देत नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. त्यांना भेटणे म्हणजे त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यासारखे होते का? असा सवाल साळगांवकर यांनी केला. या भेटीचा बाऊ करून लोबो यांनी आपली बदनामी करू नये असे त्यांनी सूनावले.
पत्नीला साळगांवातून उतरविण्याचे लोबोंचे मनसुबे
लोबो हे स्वतःच्या मतदारसंघापेक्षा साळगावातच जास्त लुडबूड करतात, तेथेच जादा शक्ती खर्च करतात, आपण करत असलेला विकास त्यांना खूपतो. त्यामुळे येनकेन प्रकारेण आपली बदनामी करण्यासाठी ते संधीची वाट पाहात असतात. लोबो यांना त्यांची पत्नी वा अन्य कुणा सग्या-सोयऱयास साळगावात निवडणुकीत उतरवायचे आहे. त्यामुळेच लोबो यांनी आपल्या कित्येक विकासकामात खो घातला. तब्बल 54 कामे त्यांनी रद्द करवून घेतली, तसेच अन्य 28 कामे अडवून ठेवलेली आहेत, त्यात ’रुर्बन मिशन’च्या 100 कोटीच्या कामांचा समावेश आहे. त्याशिवाय आपल्या कामांच्या अनेक फाईल्स गहाळ करण्यात आल्या आहेत, असे आरोप साळगांवकर यांनी केले.
मात्र लोबोंच्या विरोधाला आपण जुमानत नाही. उलटपक्षी त्यांच्या विरोधातूनच स्फूर्ती घेऊन आपण मतदारसंघात विकासकामे आणि उद्घाटनांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विकासकामे केलेली आहेत. लोकांना वीज, पाणी, रस्ते या मुलभूत सेवा सुविधा मिळवून देण्यात यशस्वी ठरलो आहे. मंत्रीपदी असूनही लोबो यांना जे जमत नाही ते एक आमदार असूनही आपण करून दाखवतो. राज्यात केवळ 9 मतदारसंघांत उपलब्ध असलेल्या मल्टी स्पेशालिटी कार्डियाक ऍम्बुलन्समधील एक माझ्या मतदारसंघात आहे. मंत्री लोबो यांना ती मिळविणे शक्य झालेले नाही. तसेच साळगांवात 12 हार्वेस्टर यंत्रे आहेत. तर लोबोंच्या मतदारसंघात केवळ 4 आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यामागील कारणे म्हणजे लोबोंचे स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष नाही. त्याचबरोबर ते दुसऱयांच्या मतदारसंघातही विकासकामे होऊ देत नाहीत. साळगांवात लवकरच 20 खाटांचे सुसज्ज इस्पितळ येणार आहे. वीज पुरवठय़ातील सुधारणांसाठी गेल्या 30-35 वर्षांत झाली नव्हती ती कामे केवळ तीन वर्षांच्या कार्यकाळात आपण करून दाखविली. त्यातून 8 कोटी खर्च करून केबल बदलले, तसेच 13 कोटी खर्च करून तब्बल 22 ट्रान्स्फॉर्मर्स बदलले, साबांखामार्फत 75 कोटींची कामे केली. पाणी पुरवठय़ातही समाधानकारक सुधारणा केली. लोबो यांनी आपले वीज उपकेंद्र, 150 कोटीचा सर्कीट रोड, गिरी येथील पाणी प्रकल्प, यासारख्या कित्येक कामात खो घातला, अडवून ठेवली, असे साळगांवकर म्हणाले.
कळंगुटमध्ये आजही रेतीतून पायवाटा
याऊलट कळंगुटमध्ये धड रस्ते सुद्धा नाहीत. तेथील रस्त्यांना पडलेल्या खड्डय़ात लोक ’तांब्या घेऊन’ बसल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पर्रा भागात तर आजही पूर्वापार रेतीच्याच पायवाटा आहेत, यावरून लोबो यांच्या विकासाची कल्पना येते, असा हल्लाबोल साळगांवकर यांनी केला. मंत्री म्हणून लोबो यांनी कळंगुटमध्ये कोणता विकास केला ते जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.