अपघातात ट्रकचा चेंदामेंदा, कांदा रस्त्यावरच विखुरला
प्रतिनिधी / बेळगाव
पिठाची पोती वाहतूक करणाऱया ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या तिहेरी अपघातात दोघा ट्रक चालकांचा मृत्यू झाल्याची घटना वंटमुरी घाटामध्ये सोमवारी रात्री 12 च्या सुमाराला घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक दुभाजकाला धडकुन विरुध्द संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱया विरुध्द बाजुने येणाऱया ट्रकला धडक दिली. त्यानंतर थांबलेल्या ट्रकला त्या ट्रकची धडक बसली. या विचित्र अपघातात ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या अपघातात पिठाची पोती आणि कांदा रस्त्यावर विखुरला होता.
याबाबत अधिक माहिती अशी बेळगावकडून संकेश्वरकडे निघालेला ट्रक क्रमांक एमएच 46 एएफ 3980 चालक निरज बलवार उर्फ रामलखन (रा. काडीया, अमिलोदा-उत्तरप्रदेश) याचे नियंत्रण सुटले. तो गुडस् ट्रक दुभाजकाला धडकत दुसऱया बाजुला गेला. संकेश्वरकडून बेळगावकडे कांदा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एमएच 12 एमव्ही 4408 याला धडक दिली. त्यानंतर त्याच बाजुला थांबलेल्या गुडस् कंटेनरला धडक बसली.
यामध्ये निरज याचा जागीच मृत्यू झाला तर संकेश्वरकडून बेळगावकडे ट्रक घेवून येणारा ड्रक चालक राजेंद्र रामभाऊ डोईफोडे (रा. घाटनंदूर, ता. खेज, जि. बीड) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचटा मृत्यू झाला. रात्री या घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले होती. यातच पाऊस देखील पडत होता. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी काही जणांच्या मदतीने वाहने बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. या तिहेरी अपघातामध्ये रस्त्यावर कांदे विखुरले गेले होते. याचबरोबर पिठ देखील पडले होते. अपघातात इतका भीषण होता की दुभाजकाला ट्रकचा भाग आदळल्यामुळे दोन भाग झाले होते. सुदैवानेच यावेळी अधिक वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
कंटेनरचा चालक मुकेशकुमार पुंजाबाई कांत (रा. पानसुर्डा) हा कंटेनर लावून चहा पिण्यासाठी धाब्यामध्ये गेला होता. त्यामुळे सुदैवानेच तो या अपघातातून बचावला आहे.